युतीच्या घोषणेपूर्वीच विरोधकांचे ट्वीटवर ट्वीट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : युतीची घोषणा करत शिवसेना आणि भाजपने लोकसभेपूर्वी मोठी खेळी खेळली आहे. एकीकडे विरोधक महाआघाडी करत आहेत, तर शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 असा फॉर्म्युला ठरवलाय. या युतीच्या घोषणेपूर्वीच विरोधकांनी शिवसेना आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपवर प्रत्येक मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या शिवसेनेने युती केलीच कशी, असा सवाल […]

युतीच्या घोषणेपूर्वीच विरोधकांचे ट्वीटवर ट्वीट
Follow us on

मुंबई : युतीची घोषणा करत शिवसेना आणि भाजपने लोकसभेपूर्वी मोठी खेळी खेळली आहे. एकीकडे विरोधक महाआघाडी करत आहेत, तर शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 असा फॉर्म्युला ठरवलाय. या युतीच्या घोषणेपूर्वीच विरोधकांनी शिवसेना आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपवर प्रत्येक मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या शिवसेनेने युती केलीच कशी, असा सवाल करत काँग्रेसकडून विविध उदाहरणं देण्यात आले आहेत. आज भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर युतीवर तब्बल 14 ट्वीट केले आहेत. भाजपशी युती करुन शिवसेनेने मांडवली हाच आपला एक कलमी कार्यक्रम असल्याचे सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्लज्ज म्हटले.‘चौकिदार चोर है’चा नारा दिला. सामनातून भाजप पुलवामातील शहिदांच्या मढ्यावरचे लोणी खात असल्याचेही शिवसेना म्हणाली होती हे विशेष, असं ट्वीट विखे पाटलांनी केलंय.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1097517017861705728

नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांवरही शिवसेनेने वारंवार पातळी सोडून टीका केली. आपल्या राष्ट्रीय नेत्यांचा इतका जाहीर अपमान झाल्यानंतरही भाजपला शिवसेनेच्या दारात जावे लागले, यातून त्यांची पराभूत मानसिकता आणि भाजपनेही स्वाभिमान गहाण ठेवल्याचे स्पष्ट होते, असा घणाघात विखे पाटलांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनीही युतीवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली?अयोध्येत राम मंदिरही बनवून झाले? नाणारही बुडवला? उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाकला धडाही शिकवून झाला? इतकेच काय तर पहारेकरी आता नीट ड्युटी करू लागला आहे? ‘तेरे मेरे सपने मिले’ मग युती होणे स्वाभाविकच आहे नाही का? असं ट्वीट त्यांनी केलंय.

शिवसेना भाजपची युती

युतीच्या चर्चेपूर्वीच शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरी प्रश्नांसह अनेक अटी भाजपने मान्य केल्या. यापैकी पहिली अट म्हणजे लोकसभेचा फॉर्म्युला. शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.

दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेची तिसरी अट म्हणजे कोकणातील नाणारमधला रिफायनरी प्रकल्प. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केलाय. स्थानिकांनी शिवसेनेकडे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी दाद मागितली होती. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे.