कोण आहेत पल्लवी पटेल, ज्यांनी मोदी-योगीच्या लाटेतही उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा पराभव केला?

| Updated on: Mar 11, 2022 | 2:05 PM

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पल्लवी पटेल यांनी आपल्या प्रचारात बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला. स्वतःला कौशंबीची सून असल्याचे सांगत वातावरण निर्मिती केली. महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांनी मोकाट जनावरांचा मुद्दाही उपस्थित केला.

कोण आहेत पल्लवी पटेल, ज्यांनी मोदी-योगीच्या लाटेतही उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा पराभव केला?
पल्लवी पटेल आणि केशव प्रसाद मौर्य.
Follow us on

उत्तर प्रदेश निवडणुकीतील बहुचर्चित चेहरा, भाजप (BJP) सरकारचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना अखेर विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांना सिराथू मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या (SP) पल्लवी पटेल यांनी धूळ चारली. पटेल यांना 106278 मते मिळाली, तर केशव प्रसाद मौर्य यांना 98941 मतांवर समाधान मानावे लागले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत केशव प्रसाद मौर्य यांनी 870 मतांची आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत पल्लवी पटेल यांना 4278 मते मिळाली, तर मौर्य यांना 2953 मते मिळाली. याच फेरीपासून पल्लवी पटेल यांनी मौर्य यांना पिछाडीवर सोडले. विशेष म्हणजे त्यानंतर एकाही फेरीत मौर्य यांना जास्त मते घेणे जमले नाही. मतमोजणीच्या 33 व्या फेरीत पल्लवी पटेल यांनी मौर्य यांच्यावर विजय मिळवला. त्यांना 7337 मतांनी पराभव पत्करावा लागला.

अवघ्या दोन आठवड्यात तयारी

केशव प्रसाद मौर्य यांना घेण्यासाठी समाजवादी पक्षाने जोरदार तयार केली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणुका सुरू होण्यापूर्वी फक्त दोन आठवडे अगोदर या जागेवर पल्लवी पटेल यांचे नाव निश्चित केले होते. सुरुवातीच्या अनेक चढउतारावर मात करत पल्ल्वी पटेल मैदानात उतरल्या. मात्र, त्यांचा विजय इतका सोपा नव्हता. त्यातही ऐनवेळेस निवडणुकीला उभ्या राहिल्याने तयारीला म्हणावा तितकासा वेळ मिळाला नव्हता.

बेरोजगारीचा मुद्दा उचलला

पल्लवी पटेल यांनी आपल्या प्रचारात बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला. स्वतःला कौशंबीची सून असल्याचे सांगत वातावरण निर्मिती केली. महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांनी मोकाट जनावरांचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि राज्यसभा खासदार जया बच्चनही मैदानात उतरल्या होत्या.

कोण आहेत पल्लवी पटेल?

भाजपशी युती करणाऱ्या अनुप्रिया पटेल यांच्या पल्लवी पटेल या सख्ख्या बहीण आहेत. त्यांचे वडील सोनेलाल उत्तर प्रदेशमधील मोठे नेते होते. ते मायावती यांच्या अत्यंत जवळचे समजले जायचे. त्यांनी अपना दलची स्थापना केली. 2009 मध्ये सोनेलाल पटेल यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा पटेल यांनी पक्षाची जबाबदारी उचलली. 2014 मध्ये मिर्झापूर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अनुप्रिया पटेल यांनी बंड केले. त्यानंतर त्यांना आणि त्यांचे पती आशिष यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये अनुप्रिया पटेल यांनी अपना दल (सोनेलाल) या नव्या पक्षाची स्थापना केली. दुसरा गट कृष्णा पटेल यांचा असून, त्याची जबाबदारी कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल या सांभाळतात.

संबंधित बातम्या:

तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळा, सहा राज्यांत एक आकडी जागा, मोदी लाटेच्या दाव्यांना मिटकरींचा ‘बंधारा’

VIDEO | देवेंद्र फडणवीस 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात; भाजप नेते पडळकरांची बोचरी टीका

शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार, आठवलेंचे भविष्य; लोकसभेला 3 जागा तरी येतील की नाही!