Parambir Singh Letter : “अब तो स्पष्ट है, यह सरकार भ्रष्ट है!” परमबीर सिंगांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर भाजप नेत्यांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 20, 2021 | 8:44 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय.

Parambir Singh Letter : अब तो स्पष्ट है, यह सरकार भ्रष्ट है! परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर भाजप नेत्यांचा हल्लाबोल
भाजप नेत्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका, राजीनाम्याची ही मागणी
Follow us on

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकलाय. सिंग यांच्या पत्रानंतर विरोध पक्ष असलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांनी गृहमंत्री आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय. कोणत्या नेत्याने सरकारवर कोणत्या शब्दात टीका केलीय आपण पाहूया. (Chandrakant Patil, Praveen Darekar, Ashish Shelar, Atul Bhatkhalkar, Kirit Somaiya, Prasad Lad criticize Home Minister Anil Deshmukh)

चंद्रकांत पाटील –

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा द्यायचा नाही, असं काय उरलं आहे? अब तो ये स्पष्ट है! यह सरकार भ्रष्ट है, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा कलेक्टर असा जो उल्लेख केला तो बरोबरच होता, असंही पाटील यांनी म्हटलंय.

आशिष शेलार –

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही राज्य सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून जोरदार टीका केलीय. “जगात नावलौकिक असलेल्या मुंबई पोलिसांचा लौकिक धुळीस मिळवून भ्रष्टाचारी पब, पेंग्विन, पार्टी गँगने पोलिसांना “वसूली अधिकारी” बनवले? पोलिसांच्या बदनामीला ठाकरे सरकार सर्वस्वी जबाबदार! जनता झुंजतेय कोविडशी, सरकारची वसूली 100 कोटीची! ठाकरे सरकारला भ्रष्टाचाराचे “परमवीर!”, असं ट्वीट शेलार यांनी केलंय.

प्रवीण दरेकर –

“महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी थेट मागणी प्रवीण दरेकर यांनी केलीय.

“ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं? खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे”, असंही दरेकर यांनी म्हटलंय.

अतुल भातखळकर –

“खंडणीचा गुन्हा असलेल्या वाझेला खंडणी गोळा करण्यासाठीच सेवेत घेतले होते काय? स्थानिक प्रकरण दर महा 100 कोटीचे आहे पवारसाहेब. वसुलीवादी काँग्रेस आणि वसुली सेनेचे संयुक्त अभियान”, असा टोला अुतल भातखळकर यांनी लगावला आहे.

प्रसाद लाड –

“अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी? अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ? बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो? यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी!” अशा शब्दात प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकावर हल्ला चढवला आहे.

संबंधित बातम्या : 

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Parambir Singh letter : परमबीर सिंगांच्या पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?, फडणवीसांचा सवाल

Chandrakant Patil, Praveen Darekar, Ashish Shelar, Atul Bhatkhalkar, Kirit Somaiya, Prasad Lad criticize Home Minister Anil Deshmukh