पुणे: राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे धुळवड सुरु आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत विरोधीपक्षांवर टीका केली होती. मात्र पार्थ पवार यांच्या टीकेपेक्षा त्यांनी वाचून केलेल्या अडीच मिनिटांच्या भाषणाचीच चर्चा होती.
पार्थ पवार यांनी अडखळत अडखळत वाचून जेमतेम अडीच ते तीन मिनिटे भाषण केलं. त्यावर त्यांच्यावर सोशल मीडियात टीका सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
“एक-दोन चुका झाल्या. याचा असा अर्थ नाही की त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. काही लोक भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो” असं पार्थ पवार म्हणाले.
नितेश राणे पार्थ पवारांच्या पाठिशी
दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांना आवाहन केलं होतं. पार्थ पवार यांच्या भाषणावरुन खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.
पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे
पार्थ पवार यांचं भाषण
पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची जाहीर सभा होती. या सभेत मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिलं भाषण केलं. आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, असंआर्जव पार्थ यांनी केलं. जवळपास अडीच मिनिटांचं हे भाषण होतं.
आज माझं पहिलं भाषण आहे, ते पण साहेब आणि दादांसमोर… त्यामुळे काही चुकामुका झाल्या तर सांभाळून घ्या. आपला देश कुठे चाललाय हे आपल्या सर्वांना दिसतंय. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. या सरकारने भारत.. भारताला कठीण पोजिशनमध्ये ठेवलंय, अडचणीत आणलंय.. आपलं जेव्हा सरकार होतं, यूपीए सरकारने जेवढे पण कामं केलं, जेवढे पण विकास केले, या सरकारांनी तशे काहीच केले नाही. हे फक्त बीजेपी सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवणारं आहे, असा आरोप पार्थ यांनी केला होता.
संबंधित बातम्या
VIDEO: मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचं पहिलं जाहीर भाषण