नागरिकत्व कायद्याविरोधात शिकलेले नक्षली अफवा पसरवतात : पंतप्रधान मोदी

| Updated on: Dec 22, 2019 | 3:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 डिसेंबर) दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगूल फूंकलं आहे (PM Modi on CAA NRC Arban Naxal).

नागरिकत्व कायद्याविरोधात शिकलेले नक्षली अफवा पसरवतात : पंतप्रधान मोदी
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 डिसेंबर) दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगूल फूंकलं आहे (PM Modi on CAA NRC Arban Naxal). केंद्र सरकारने दिल्लीतील 1731 अवैध कॉलनींना अधिकृत केलं. त्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी भाजपने धन्यवाद रॅलीचं आयोजन केलं. त्यात बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात शिकलेले नक्षली, अर्बन नक्षली अफवा पसवत आहेत, असा आरोप केला. भाजपने या रॅलीत जवळपास 5 लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज लावला होता (PM Modi on CAA NRC Arban Naxal).


नरेंद्र मोदी म्हणाले, “मी देशातील तरुणांना आग्रह करतो की त्यांनी एकदा हा कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. अजूनही जे भ्रमात आहेत त्यांना मी हेच सांगेल की काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत.”


ज्यांचे पूर्वज भारताचे सुपूत्र आहेत अशा भारतातील मुस्लिमांचा नागरिकत्व कायदा आणि एनआरसीशी काहीही संबंध नाही. त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार नाही. देशात असे डिटेन्शन कॅम्पच नाहीत. हे धादांत खोटं आहे. हा वाईट खेळ आहे, असंही मोदींनी सांगितलं.

“ममता दीदी अफवा पसरवत आहेत”

मोदींनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही सडकून टीका केली. तसेच त्या अफवा पसरवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहचल्या. याच ममता बॅनर्जी घुसखोरी रोखा, बाहेरुन येणाऱ्या शरणार्थींना नागरिकत्व द्या, अशी मागणी करत होत्या. ममता दीदींना आता काय झालं, त्या आता का बदलल्या, का आता त्या अफवा पसरवत आहेत? निवडणुका होतात, जातात. पण त्या बंगालच्या लोकांना शत्रू का मानतात?”


ममता बॅनर्जी कुणाला विरोध करत आहेत आणि कुणाला पाठिंबा देत आहेत हे देश पाहत आहे. ज्या डाव्यांना देशाने नाकारले त्यांचे नेते प्रकाश करात यांनी धार्मिक कारणाने अत्याचारामुळे येणाऱ्या शरणार्थींना मदत करण्याची मागणी केली होती. आज त्यांचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. ते फक्त मतांचं राजकारण करत होते, असाही आरोप मोदींनी केला.


मोदींनी सभेला आलेल्या लोकांना दिल्लीच्या ज्या भागात राहतात तेथे जोरदार स्वच्छता मोहिम राबवण्याचंही आवाहन केलं. त्यांनी उपस्थितांना 1 जानेवारीला नव्या वर्षाची सुरुवात अधिक स्वच्छतेने करण्याचा आग्रह केला. तसेच सिंगल युज प्लास्टिकपासून मुक्तीसाठी आपल्या कॉलनीत काम करण्यास सांगितले.

रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे (NDA) कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. भाजपचे 7 खासदार, 281 विभाग प्रमुख, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांना लोकांना जमवण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. या सर्वांना कमीत कमी 500 लोकांना आणण्याचे लक्ष्य देण्यात आलं होतं.