75000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑफर लेटर, वाचा कोणत्या विभागात मिळाली नोकरी?

पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

75000 तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑफर लेटर, वाचा कोणत्या विभागात मिळाली नोकरी?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 22, 2022 | 12:56 PM

नवी दिल्लीः यंदाची दिवाळी रोजगाराभिमुख असेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलाय. केंद्र सरकारतर्फे 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. रोजगार मेळावा (Rojgar Mela), असं याला म्हटलं जातंय. या अंतर्गत दिवाळीच्या सुरुवातीलाच आज 75,000 तरुणांना सरकारी नोकरीचं  (Government job)ऑफर लेटर देण्यात आलंय. ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते हे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं.

यासह देशभरातील 50 केंद्रीय मंत्र्यांनीही विविध ठिकाणाहून 20हजार लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिलंय. सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियोजित ठिकाणचं वैयक्तिक स्वरुपात अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलंय.

सरकारनी नोकरीसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांद्वारे अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं. तर उर्वरीत उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टाद्वारे ऑफर लेटर दिलं जाईल. तरुणांना ऑफर लेटर देतानाच पंतप्रधानांनी त्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील आठ वर्षात देश रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या मालिकेत आज आणखी एक पाऊल टाकलं गेलं. रोजगार मेळाव्यात ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.

कुठे झाली ही भरती?

  • भारत सरकारच्या 38 मंत्रालयांतील विविध विभागांसाठी ही नोकर भरती झाली.
  •  ग्रुप अ आणि ब (गॅझेट), ग्रुप बी- (नॉन गॅझेट) आणि ग्रुप-सी कॅटेगरी अंतर्गत विविध मंत्रालयांमध्ये या तरुणांना नोकरी देण्यात आली आहे.
  •  केंद्रीय सशस्त्र दल कर्मचारी, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, इनकम टॅक्स इन्स्पेक्टर, एमटीएससह विविध पोस्टवर ही नियुक्ती झाली आहे.

भारत सरकारच्या विविध मंत्रालय व विभागांनी ही भरती प्रक्रिया केली आहे. यासह संघलोक सेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भर्ती बोर्ड यासारख्या निवड एजन्सीजद्वारे या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.