एकनाथ शिंदे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलंच; प्रवीण दरेकर यांचा खोचक टोला

मुंबईचे महापौर म्हणून छगन भुजबळ यांचंच नाव समोर येतं. या त्यांच्या विधानावरही त्यांनी सारवासारव केली. मला वाटतं माझ्या वाक्याचा विपर्यास केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलंच; प्रवीण दरेकर यांचा खोचक टोला
एकनाथ शिंदे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलंच
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 24, 2022 | 5:08 PM

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. काल त्यांनी औरंगाबादचा दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची भाजपने खिल्ली उडवली आहे. एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचं अभिनंदन करतो. अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलंच, असा टोला माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

माजी मुख्यमंत्र्यांचा सर्वात गतीमान दौरा होता. इतक्या छोट्या काळात त्यांनी काय पाहाणी केली हे कळत नाही. जेव्हा हे विरोधी पक्षात होते तेव्हा जी मागणी केली ती पु्न्हा केली आहे. जेव्हा मुख्यमंत्री होता त्यावेळी का शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत केली? ते तरी जाहीर करा, असं सांगतानाच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर पुन्हा पाठवलं. किमान त्या निमित्ताने ते मातोश्रीच्या बाहेर पडले, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

एका जाहिरातीत मिलिंद नार्वेकर यांच्या टीशर्टवर धनुष्यबाणाचं चिन्हं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनुष्यबाणाची चर्चा रंगली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटतं असा विचार करू नये. ते टी शर्ट जुने असेल. मला वाटतं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मशाल हे चिन्ह मान्य केले आहे. त्यामुळे पुढे धनुष्यबाण मिळेल न मिळेल पण मिशाल त्यांनी लोकांपर्यंत पोहचवायला सुरूवात केली आहे, असं ते म्हणाले.

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादावरही त्यांनी भाष्य केलं. बच्चू कडू आणि राणा या दोघांनाही दोन्ही नेते बोलावतील. हे प्रकरण आता इथे थांबवयाला हवे. मला वाटतं नेते या संपूर्ण प्रकरणाला गांभिर्याने घेतील, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईचे महापौर म्हणून छगन भुजबळ यांचंच नाव समोर येतं. या त्यांच्या विधानावरही त्यांनी सारवासारव केली. मला वाटतं माझ्या वाक्याचा विपर्यास केला जात आहे. जो माणूस त्या पदावर चांगले काम करतो, त्याच्यांशी ते पद जोडले जाते. म्हणून मी म्हणालो की महापौर कोण तर अजूनही लोकांना भुजबळ वाटतातं, अशी सारवासारव त्यांनी केली.