अहमदनगर : लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर येत असून मंत्र्यांच्या अधिका-यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येतायत. त्याचमुळे कालचा महाराष्ट्र बंद पुकारला गेला, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. या सरकारने विश्वास गमावला आहे. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल विखेंनी केला.
सरकारची एवढी बदनामी झालीय की सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावलाय. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री फरार असल्याची ही पहिली घटना आहे. आयकरच्या धाडीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार समोर आलाय. असे अनेकही मंत्री अडकलेले असून कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली? कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले? हे समोर येणारच आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
भ्रष्ट्राचाराचे रॅकेट आता उध्वस्त झालेच पाहिजे. राज्य सरकारचे हात भ्रष्ट्राचाराने बरबटलेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा 72 वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपादन समारंभ आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते पार पडला. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मन की बात’ सांगितली आहे. आता तर चक्क त्यांनी मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं जाहीर विधान त्यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’