औरंगाबाद: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (16 ऑक्टोबर) औरंगाबादमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघात विरोधकांवर जोरदार तोफ डागली. यावेळी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरुन राज ठाकरे (Raj Thackeray on Farmer Suicide) चांगलेच संतापले. शेतकऱ्यांनी ज्यांच्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागते, त्यांना संपवून जावं, असं म्हणत राज ठाकरेंनी आपला संताप (Raj Thackeray on Farmer Suicide) व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपचा टी शर्ट घालून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी काही तास आधी एक तरुण शेतकऱ्याने भाजपचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जो जन्म मिळाला तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी घालवण्याऐवजी महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांवर गळ्याला फास लावून आयुष्य संपवण्याची वेळ येते. सत्तेत बसलेल्या या नादानांमुळे शेतकऱ्यांना आपलं आयुष्य संपवावं लागतं. जर आयुष्य संपवायचंच असेल, तर ज्याच्यामुळे संपवावं लागत आहे, त्याला संपवून जा.”
चुकीच्या लोकांना निवडून देऊन 5 वर्ष पश्चाताप करण्यापेक्षा योग्य उमेदवाराला निवडून द्या, असंही आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलं. राज ठाकरे पुढे म्हणाले, “मी विनोद करायला किंवा कोणावर टिका करायला आलो नाही. मी सशक्त विरोधक म्हणून निवडणुका लढवतो आहे. राज्यकर्त्यांना जाब विचारा.” तुमच्या पिकास भाव नाही. तुम्हालाच सत्ताधारी भाव देत नाही. अशावेळी राग व्यक्त करा, चिड व्यक्त करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.
मुलभुत प्रश्न रखडले आहेत. संपूर्ण देशात मंदीची लाट आहे आणि अमित शहा कलम 370 वर मते मागत आहेत. जे केलं ते चांगल झालं, पण पुढं काय असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मला काम करण्याचं आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारांना संधी द्या, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.