Raj Thackeray on Ketaki Chitale : शरद पवारांवर जातीवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंकडून केतकीच्या पोस्टचा समाचार! मानसिक विकृतींना आवर घालण्याचाही सल्ला 

| Updated on: May 14, 2022 | 4:39 PM

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, अशा शब्दात राज यांनी केतकीच्या पोस्टचा समाचार घेतलाय.

Raj Thackeray on Ketaki Chitale : शरद पवारांवर जातीवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंकडून केतकीच्या पोस्टचा समाचार! मानसिक विकृतींना आवर घालण्याचाही सल्ला 
राज ठाकरे यांच्याकडून केतकी चितळेच्या पवारांवरील पोस्टचा समाचार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केला होता. गुढीपाडव्याची सभा, ठाण्यातील उत्तरसभा आणि औरंगाबादेतील सभेतही राज ठाकरे यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं. एकीकडे जातीवादाच्या मुद्द्यावरुन पवारांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) चांगलाच समाचार घेतलाय. ‘आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येण साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे’, अशा शब्दात राज यांनी केतकीच्या पोस्टचा समाचार घेतलाय.

राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा समाचार

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत… आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

केतकी चितळेची पवारांवरील पोस्ट काय?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll