Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यावर ‘शिवतीर्था’वर काय स्थिती ? यशवंत किल्लेदार म्हणाले चहापाणी, वडापाव खाणं सुरु!

| Updated on: May 03, 2022 | 7:44 PM

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवतीर्थावरील वातावरण कसं आहे? असा प्रश्न विचारला असता 'काही नाही, आतमध्ये नेहमीसारखं वातावरण आहे. चहापाणी सुरु आहे, वडापाव खात आहेत' असं उत्तर त्यांनी दिलंय.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यावर शिवतीर्थावर काय स्थिती ? यशवंत किल्लेदार म्हणाले चहापाणी, वडापाव खाणं सुरु!
राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेतही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. दरम्यान, याच सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस (Aurangabad Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर मनसेच्या जिल्हाधिकाऱ्यांसह जवळपास 15 हजार पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर हालचाली पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अशावेळी मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) शिवतीर्थावर पोहोचले. काही वेळ राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन ते निधाले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवतीर्थावरील वातावरण कसं आहे? असा प्रश्न विचारला असता ‘काही नाही, आतमध्ये नेहमीसारखं वातावरण आहे. चहापाणी सुरु आहे, वडापाव खात आहेत’ असं उत्तर त्यांनी दिलंय.

‘पोलीस अटक करत असतील तर सहकार्य करु’

किल्लेदार म्हणाले की, राज ठाकरे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की पुढील भूमिका ते स्पष्ट करतील. त्यानुसार ते एक पत्रक काढणार आहेत. ते पत्रक तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. थोड्यावेळात ते जाहीर करतील. पत्रकाद्वारे आंदोलनाची पुढील दिशा कळेल. 15 हजार पदाधिकाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे, आम्ही आमचं काम करु. बाकी कायदेशीर बाबींवर कायदेतज्ज्ञांशी बोलून स्वत: राज ठाकरे निर्णय घेतील. अद्याप अटक करुन घेण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही. पोलीस अटक करत असतील तर आम्ही त्यांना सहकार्य करु, असंही यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण आणि वैयक्तिक टीका केल्या प्रकरणी कलम 116, 117, 153 आणि सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा झाली होती. पोलिसांनी या सभेसाठी एकूण 16 अटी घातल्या होत्या. त्यातील एका अटीत 15 हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, राज यांच्या सभेला 1 लाखा पेक्षा अधिक लोक उपस्थित असण्याचा अंदाज आहे. तसंच राज यांना वैयक्तिक टीका नको अशीही अट घातली होती. मात्र, या दोन्ही अटींसह एकूण 12 अटींचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा