अजित पवारांनी ‘या’ पदाचा राजीनामा द्यावा, तिथे उद्धव ठाकरे यावेत, रामदास कदमांची मागणी काय?

| Updated on: Oct 24, 2022 | 2:13 PM

जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत मदत करता येणार नाही, फक्त दिखावा करण्यासाठी उद्धव ठाकरे कोल्हापुरात गेले असा मला वाटते, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.

अजित पवारांनी या पदाचा राजीनामा द्यावा, तिथे उद्धव ठाकरे यावेत, रामदास कदमांची मागणी काय?
Follow us on

गोविंद ठाकूर, मुंबईः दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेतील बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सणसणीत टीका केली. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकही महत्त्वाचा निर्णय घेतला नाही. मंत्रालयात येऊन सक्रीय कामगिरीही केली नाही. त्यामुळे माझी एक मागणी आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी हे पद त्यांच्याकडे घ्यावे, असं ज्येष्ठ नेते रामदास कदम म्हणालेत.

रामदास कदम यांनी आज आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते स्वतः दिवाळी साजरी करत नाहीत, यामागचं कारण सांगितलं.

ते म्हणाले, आदिवासी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे मी खूप दुःखी आहे. म्हणूनच मी दिवाळी साजरी करणे टाळतो, असे कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, ज्यांना कावीळ असते त्यांना दुनिया पिवळी दिसते. तीच अवस्था उद्धव ठाकरेंची झाली आहे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले नाहीत. अडीच वर्षांत केवळ दोन ते तीन वेळा मंत्रालयात आले. अडीच वर्षांत एकही निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणी झाली नाही…

कोकणात मोठे संकट आले. लाखो कुटुंब उध्वस्त झाली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे त्यांचे अश्रू पुसायला मदत करायला गेले नाहीत. त्यांचा मुलगाही गेला नाही, असा आरोप कदम यांनी केला.
आज मला आनंद होत आहे की उद्धवजी कोल्हापुरात शेतकर्‍यांकडे गेले. त्यांना किती माहिती आहे माहीत नाही, पण अजूनही पंचनामा सुरू आहे… आणि जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत मदत करता येणार नाही, फक्त दिखावा करण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे गेले असा मला वाटते, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.

उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, औरंगाबादेत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावरून टोमणा मारताना रामदास कदम म्हणाले, ‘ मला आता अंतःकरणापासून वाटतंय, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी हे पद स्वीकारावं…