‘मी पुन्हा येईन’चं स्वप्न अजूनही जिवंत!, रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला

| Updated on: Mar 22, 2021 | 11:13 PM

देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचं एक ट्वीट रिट्वीट करत पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता फडणवीसांसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय.

मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!, रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचं एक ट्वीट रिट्वीट करत पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता फडणवीसांसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय.(Rohit Pawar criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis and BJP leaders)

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट –

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि…

Posted by Rohit Rajendra Pawar on Monday, 22 March 2021

 

‘विरोधी पक्ष सत्तेसाठी उतावीळ’

गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं.

‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’

एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो.

‘सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार करा’

अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा.

काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा.

संबंधित बातम्या :

वाझे-देशमुख यांची भेट झाली नाही; ना राजीनाम्याची, ना चौकशीची गरज, शरद पवारांची भूमिका

देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे, त्या पुराव्याविरोधात फडणवीसांचा VIDEO पुरावा

शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत; गिरीश बापटांचा घणाघात

Rohit Pawar criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis and BJP leaders