राहुल गांधींना शिवडी कोर्टाकडून जामीन, काँग्रेसच्या माजी खासदाराची कोर्टात हमी

| Updated on: Jul 04, 2019 | 12:04 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिवडी कोर्टाने दिलासा दिला. कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केला. 15 हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं.

राहुल गांधींना शिवडी कोर्टाकडून जामीन, काँग्रेसच्या माजी खासदाराची कोर्टात हमी
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिवडी कोर्टाने दिलासा दिला. कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं. 15 हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली. कोर्टात राहुल गांधींनी आपण निर्दोष असल्याचं सांगितलं.  राहुल गांधी पावणे बाराच्या सुमारास कोर्टातून बाहेर आले. “संघाविरोधात लढाई सुरुच ठेवणार, राजीनाम्याबाबत मी पत्रात सविस्तर सांगितलं आहे. गरीब, कष्टकऱ्यांसोबत मी नेहमीच उभा असेल. गेल्या 5 वर्षात ज्या ताकदीने लढलो, त्यापेक्षा 10 पटीने लढेनठ असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राहुल गांधी मुंबईतील शिवडी कोर्टात हजर झाले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याविरोधात संघ स्वयंसेवकांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यासाठी राहुल गांधी आज मुंबईत आले होते.


काय आहे प्रकरण?

सप्टेंबर 2017 मध्ये  गौरी लंकेश यांची बंगळुरुत राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करुन संघ-भाजपवर हल्ला चढवला होता. “संघाच्या विचारधारेविरोधात बोलणाऱ्यांवर दबाव टाकला जातो, मारहाण केली  जाते, हल्ले होतात आणि इतकंच नाही तर ठारही केलं जातं”, असं राहुल गांधी म्हणाले होते.

याप्रकरणी वकील आणि आरएसएस कार्यकर्ते ध्रुतीमान जोशी यांच्या तक्रारीनंतर राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि सोनिया गांधी यांना समन्स पाठवण्यात आला होता.  याबाबत मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी मुंबईत आहेत.

राहुल गांधींनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध थेट संघ आणि भाजपशी जोडला होता. याच प्रकरणात सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनाही समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सोनिया आणि सिताराम येचुरी यांच्याविरोधातील तक्रार खोडून काढण्यात आली होती.