Saamana : नवे मुद्दे उकरून देशभरात दंगली जातील, त्याच भावनेवर 2024 च्या निवडणुका होतील, सामना अग्रलेखातून भाजपवरती टीका

सध्या वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा भाजपने अजेंडय़ावर घेतलेला दिसतो. सध्या हे प्रकरण न्यायालयात एकदम जोरात सुरू आहे. मंदिर की मशीद, याचे उत्खनन कोर्टाच्या सर्व्हेअरने केल्यावर मशिदीच्या जागेत शिवलिंग सापडल्याचे सांगितले गेले.

Saamana : नवे मुद्दे उकरून देशभरात दंगली  जातील, त्याच भावनेवर 2024 च्या निवडणुका होतील, सामना अग्रलेखातून भाजपवरती टीका
नवे मुद्दे उकरून देशभरात दंगली घडविल्या जातील
Image Credit source: twitter
| Updated on: May 20, 2022 | 6:55 AM

मुंबई : “मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय भाकऱ्या त्याच आगीवर पेटवल्या जात आहेत, पण या आगीपेक्षा पोटाची आग महत्त्वाची आहे. त्या आगीचा वणवा पेटल्यावर काय होते त्याचे ‘पेटते’ उदाहरण बाजूच्या श्रीलंकेत (sri lanka) दिसते आहे. महागाई (Inflation), भूक, आर्थिक अराजकतेतून निर्माण झालेल्या प्रश्नांवर धार्मिक मुद्दे विजय मिळवू शकले नाहीत, म्हणून मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना सगळय़ांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्डय़ांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!” अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ताजमहालच्या जमिनीखाली काय दडलंय तेसुद्धा खणून काढा

सध्या वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा भाजपने अजेंडय़ावर घेतलेला दिसतो. सध्या हे प्रकरण न्यायालयात एकदम जोरात सुरू आहे. मंदिर की मशीद, याचे उत्खनन कोर्टाच्या सर्व्हेअरने केल्यावर मशिदीच्या जागेत शिवलिंग सापडल्याचे सांगितले गेले. त्याचवेळी योगी आदित्यनाथ हे लखनौचे लक्ष्मणपूर असे नामकरण करणार आहेत. भाजपच्या विकासाचे मॉडेल हे अशा पद्धतीने सुरू आहे. भारतात हनुमान चालिसा, भोंगा प्रकरण लोकांनी अधिक मनावर घेतलं नाही. प्रत्येक वेळी एखादी नवी रामकथा किंवा कृष्णकथा रचायची असे प्रकार भाजपकडून सुरू आहेत. ताजमहालच्या जमिनीखाली काय दडलंय तेसुद्धा खणून काढा, अशी मागणी यांच्यापैकीच काही जणांनी करावी ही गंमत आहे असा टोला भाजपला सामनामधून लगावला आहे.

नव्याने असेच काही मुद्दे उकरून काढून देशभरात दंगली घडविल्या जातील

“अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यासाठी बाबरीचा ढाचा पाडावा लागला. त्याकामी हजारो कारसेवकांना बलिदान द्यावे लागले. आता नव्याने असेच काही मुद्दे उकरून काढून देशभरात दंगली घडविल्या जातील व त्याच भावनेवर 2024 च्या निवडणुका लढविल्या जातील, अशी भीती ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी राममंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

“एखाद्याच्या मनात कसलीही कडवट भावना असेल तर ती विसरण्याचा हा दिवस आहे,” असे पंतप्रधान म्हणाले व ते योग्यच होते.