“शिवरायांचं चरित्र विसरलं जातंय, महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचं काम सुरू?”, भाजपच्या भूमिकेवर सामनातून टीकास्त्र

| Updated on: Nov 27, 2022 | 8:01 AM

सामनातून भाजपवर टीकास्त्र...

शिवरायांचं चरित्र विसरलं जातंय, महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचं काम सुरू?, भाजपच्या भूमिकेवर सामनातून टीकास्त्र
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचा अपमान आणि भाजपची भूमिका यावर भाष्य करण्यात आलंय. “वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंदची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढय़ास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता. टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले. शिवाजी-भवानीच्य नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला. मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाहय झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते?, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत! महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान विषप्रयोगाप्रमाणे तडीस जात आहे! उसळून उठण्याची महाराष्ट्राची क्षमता नष्ट होत आहे!, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.