Priety Zinta : शाहरुख, सलमान नव्हे, प्रीतीला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचं आहे काम
Preity Zinta : प्रीती झिंटा 8 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. याच दरम्यान तिच्या 'दिल चाहता है' चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झालीत.प्रीतीला एका सुपरस्टारसोबत पुन्हा काम करायची इच्छा आहे. कोण आहे तो ?

फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘दिल चाहता है’ याला याच महिन्यात प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली. या खास टप्प्याच्या निमित्ताने हा कल्ट क्लासिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच लोकप्रिय आहे. या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने या चित्रपटाच्या आठवणी पुन्हा जागवल्या जात आहेत. एकेकाळी तरूणाईला वेड लावणाऱ्या या चित्रपटाला 25 वर्ष झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री प्रीती झिंटानेही (Priety Zinta) या पिक्चरबद्दल अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. मात्र, या खास प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या रीयुनियनमध्ये तिला सहभागी होता आलं नाही. सध्या प्रीती तिच्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
मीडियाशी संवाद साधताना प्रीतीने याबाबत मजेशीर प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, तिला तिच्या कमबॅक चित्रपटाच्या प्रमोशन आणि ‘दिल चाहता है’च्या रीयुनियनपैकी एकाची निवड करावी लागली. प्रीती म्हणाली, “मला खूप साऱ्या आठवणी शेअर करायच्या होत्या. पण आमिरनेच आमचं बंटवारा केला. मला ‘बंटवारा’च्या प्रमोशनसाठी यावं लागलं आणि ते लोक ‘दिल चाहता है’ची 25 वर्षं सेलिब्रेट करायला गेले.”
आमिर खानसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा
या वेळी प्रीतीने आमिर खानसोबत पुन्हा स्क्रीन शेअर करण्याची इच्छाही व्यक्त केली. ‘दिल चाहता है’प्रमाणेच संस्मरणीय ठरेल, अशा चित्रपटात लवकरच दोघं काम करू, अशी आशा तिने व्यक्त केली. मी त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मला आशा आहे की आम्ही पुन्हा एखाद्या अशा चित्रपटात एकत्र येऊ, जो ‘दिल चाहता है’ इतकाच अविस्मरणीय ठरेल. ‘दिल चाहता है’ हा माझ्यासाठी अत्यंत खास चित्रपट होता. तसंच ‘बंटवारा 1947’ हाही माझ्यासाठी खूप संस्मरणीय चित्रपट ठरणार आहे” असं प्रीती म्हणाली
‘दिल चाहता है’ आजही का आहे खास?
फरहान अख्तर याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा तीन मित्रांभोवती फिरते. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे तिघे प्रेम, मैत्री आणि आयुष्यातील विविध अडचणींचा सामना करतात. चित्रपटाची फ्रेश कथा, दमदार अभिनय आणि संस्मरणीय संगीत प्रेक्षकांना खूप आवडले. विशेष म्हणजे, ‘दिल चाहता है’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. आज 25वर्षांनंतरही हा चित्रपट हिंदी सिनेमातील मैत्रीवर आधारित सर्वाधिक लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक मानला जातो.
