आमदारांच्या विकास निधीचं असमतोल वाटप म्हणजे दरोडा, वाटमारीच!; सामनातून घणाघात

Saamana Editorial on MLA funds Allocation : आमदारांच्या निधीवाटपाचे प्रकरण केवळ पाणी चाखणारं नसून 'भर अब्दुल्ला गुड थैली में…'; सामनातून शिंदे सरकारवर निशाणा

आमदारांच्या विकास निधीचं असमतोल वाटप म्हणजे दरोडा, वाटमारीच!; सामनातून घणाघात
| Updated on: Jul 26, 2023 | 7:57 AM

मुंबई | 26 जुलै 2023 : आमदारांच्या निधीवाटपावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. निधीवाटपामध्ये असमानता दिसत असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. आमच्यावर अन्याय झालाय. इतक्या तुटपुंज्या निधीत मतदार संघाचा विकास कसा करायचा? सावत्र भावासारखी आम्हाला वागणूक दिली जात आहे, असं यशोमती ठाकून म्हणाल्या. आमदारांच्या निधी वाटपावरच आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. भर अब्दुल्ला गुड थैली में.!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा…

आमदारांच्या विकास निधीचे हे असमतोल वाटप म्हणजे दरोडा किंवा वाटमारीच आहे. फुटलात तर निधी मिळेल, बेइमानी केलीत तर मालामाल व्हाल, हा राजकीय संदेश महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी दिला व हा पायंडा घातक आहे.

निधी वाटपाविषयी ‘जो तळे राखेल, तो पाणी चाखेल,’ ही भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया म्हणजे सरकारी पक्षपाताची धडधडीत कबुलीच आहे. तथापि, आमदारांच्या निधीवाटपाचे हे प्रकरण केवळ पाणी चाखणारे नसून ‘भर अब्दुल्ला गुड थैली में…’ अशा स्वरूपाची ही लूट आहे!

मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या मिंधे गटावर म्हणजे खोकेछाप आमदारांवर निधींची कोटी कोटींची उधळण करीतच असतात. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दानशूरतेची भर पडली आहे, पण त्यांचा हा कर्णावतार एकतर्फी आहे.

अजित पवार यांनीही त्यांच्याच फुटीर गटाच्या आमदारांना भरघोस निधी दिला व विधानसभेतील विरोधी बाकांवरील आमदारांची झोळी रिकामी ठेवली. हा सत्ताधारी आमदारांवर निधीवर्षाव नसून महापूर आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत शहाजोगपणे सांगितले आहे, ‘आमदारांकडून मतदारसंघातील आपल्या कामांसाठी प्रस्ताव येतात. त्यानुसार हे प्रस्ताव संबंधित विभागांकडे पाठवले जातात. त्यानुसार कामे मंजूर झाल्यावर निधीचे वाटप होते.”

श्री. फडणवीस म्हणतात, ‘महाविकास आघाडीच्या काळात भाजप आमदारांना निधी देण्यात आला नव्हता. अर्थात त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार नाही. विरोधी पक्षांच्या आमदारांनाही गुणवत्तेनुसार निधी दिला जाईल.” श्री. फडणवीस हे संसदीय राजकारणात अनेक वर्षे आहेत. आमदार हा आमदार असतो. तो दीड-दोन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. आपण राज्याचे नेतृत्व करता व आमदारांना निधी नाकारून एक प्रकारे जनतेवरच अन्याय करता. म्हणजे जी वासरे तुमच्या गोठ्यात येण्यास तयार नाहीत, त्या वासरांना तुम्ही अशा प्रकारे मारतच आहात.