भारतरत्न, भाजपची भूमिका आणि राहुल गांधी, सावरकर यांच्यावरील विधानावर सामनातून भाष्य

| Updated on: Nov 19, 2022 | 8:30 AM

आजच्या सामनातून सावरकरांना भारतरत्न देण्यावर भाष्य करण्यात आलंय...

भारतरत्न, भाजपची भूमिका आणि राहुल गांधी, सावरकर यांच्यावरील विधानावर सामनातून भाष्य
Follow us on

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपने राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत नसल्याचं सांगितलं. आता आजच्या सामनातून (Saamana Editorial) भारतरत्न आणि भाजपची भूमिका यावर टीका करण्यात आली आहे. तसंच राहुल गांधींच्या भूमिकेवरही भाष्य करण्यात आलंय.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असं सामनात म्हणण्यात आलंय.

राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात , पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात?, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो , आदर करतो . त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो , करत राहील!, असं म्हणत राहुल गांधींच्या विधानावरही भाष्य करण्यात आलंय.

भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी श्री. राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय.