नांदेड : राजकीय दुकान चालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आंदोलन करत आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सरकारबाहेर पडावं, असं खुलं आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांनी दिलं आहे. त्यांचा सरकारबरोबर जाऊन भ्रमनिरास झाल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी खोत यांनी केला.
राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे. या सरकार कडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टी यांनी बाहेर पडावे, असं खुलं आव्हान देताना राजू शेट्टींचं शेतकऱ्यांबाबत प्रेम पुतना मावशीचं आहे, अशी जलजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर केलीय.
“त्यांचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.
मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. ते शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शेट्टींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
(Sadabhau Khot Open Challenge to Raju Shetti)
हे ही वाचा :
“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला