‘हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, सदाभाऊ खोतांचं शरद पवारांना खोचक पत्र

| Updated on: Oct 18, 2021 | 6:13 PM

अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.

हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, सदाभाऊ खोतांचं शरद पवारांना खोचक पत्र
सदाभाऊ खोत, शरद पवार
Follow us on

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक खोचक पत्र लिहिलं आहे. ‘हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांकडे केलीय. (Sadabhau Khot’s letter to Sharad Pawar demanding farmers to cultivate herbal tobacco)

सदाभाऊं खोतांचं पवारांना पत्र

आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे.कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे.आपल्या सारखे शेतीतील जाणते गुरु असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत.शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.

सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे.गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे.म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्यांने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे.

राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहजासहजी मिळत नाही. पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडी साठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल.

एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजातील फरक कळतो की नाही?- मलिक

दरम्यान, नवाब मलिक यांनी माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?, असा सवाल केला आहे. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

‘सरकारनं हे एक तरी पारदर्शक काम करावं’, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरुन बच्चू कडूंचा घरचा आहेर

Video : अमरावतीत जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी!

Sadabhau Khot’s letter to Sharad Pawar demanding farmers to cultivate herbal tobacco