सांगलीच्या वेशीवर कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं… मुख्यमंत्री शिंदेंची हिंदू गर्व यात्रा ‘सामना’तून टार्गेट

| Updated on: Sep 21, 2022 | 7:00 AM

गुजरातचे राज्यपाल देवदत्त आचार्य यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत एकनाथ शिंदे गटावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

सांगलीच्या वेशीवर कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं... मुख्यमंत्री शिंदेंची हिंदू गर्व यात्रा सामनातून टार्गेट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः सांगली जिल्ह्यातील (Sangli) साधूंना झालेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) आज जोरदार निशाणा साधण्यात आलाय. महाविकास आघाडी (MVA Government) सरकारच्या काळात पालघरच्या साधुकांडांचे घाणेरडे राजकारण करणारे आज सत्तेत आहेत. पण सांगलीत घडलेल्या साधुकांडावर त्यांनी ब्र देखील काढला नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच हिंदू गर्व यात्रा काढणार आहेत, त्यावरही अग्रलेखातून कडवी टीका करण्यात आली आहे. भाजपचे कळसूत्री बाहुले ‘मामु’ साहेब ‘हिंदू गर्व यात्रा’ काढणार आहेत. पण सांगलीतल्या भगव्या साधूंचा करुण आक्रोश या चाळीस लफंग्यांना ऐकू गेला नाही, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

गुजरातचे राज्यपाल देवदत्त आचार्य यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. हिंदू म्हणजे एक नंबरचे ढोंगी आहेत, असे त्यांचे वक्तव्य आश्चर्यकारक असले तरी महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटवाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते, असे अग्रलेखात म्हटले आहे.

सांगलीतल्या जत तालुक्यातल्या लवंगा गावात 13 सप्टेंबर रोजी जे साधुकांड घडले. मथुरेला जाणाऱ्या साधूंना बेदम मारहाण झाली. पोलिसांनी काही जणांना अटक केली असली तरीही स्वतःला हिंदुत्वाचे नवतारणहार म्हणवून घेणाऱ्या राज्य सरकारला हे साधुकांड गंभीर वाटू नये, याचे आश्चर्य वाटते, अशी बोचरी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मविआ सरकारच्या काळात अशीच घटना पालघरमध्ये घडली होती, तेव्हा ‘गोदी ‘ मीडियाने चर्चा आणि धिक्काराचा नुसता हैदोस घातला होता. महाराष्ट्रात शिवसेनेचे हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खुंटीस टांगून ठेवले असे तीर चालवले, मग ही आपटाआपटी सांगलीच्या साधुकांडात का दिसू नये? की सांगली मार खाल्लेले साधू भगव्या वेशातले अरबी होते का? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्याने हिंदुत्व सुटले म्हणून आम्ही शिवसेनेशी बेईमानी केली, असे सांगणाऱ्या ४० लफंग्यांनाही सांगली जिल्ह्यातील लवंगा तालुक्यातील भगव्या साधूंचा करुण आक्रोश ऐकू गेला नाही. अशा मंबाजींकडून हिंदुत्वाची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.