अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण उद्धवराव, राऊतांना हटवा : संभाजी भिडे

| Updated on: Jan 17, 2020 | 11:40 AM

शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधानं करणारे संजय राऊत, त्यांना स्थानावरुन मोकळं करावं, असं संभाजी भिडे सांगलीत म्हणाले.

अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण उद्धवराव, राऊतांना हटवा : संभाजी भिडे
Follow us on

सांगली : शिवसेना देशभरात वाढावी अशी आपलीही इच्छा आहे, कारण अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेनेची देशाला आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी संजय राऊत यांना पदावरुन हटवा, अशी हात जोडून विनंती ‘शिवप्रतिष्ठान’चे नेते संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे (Sambhaji Bhide appeals Uddhav Thackeray) केली. संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भिडेंनी ‘सांगली बंद’ची हाक दिली आहे.

‘शिवसेना याचा अर्थ छत्रपती परंपरेचा चालू असलेला जो श्वासोच्छ्वास आहे, ते लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांना मी एकच विनंती करेन, की त्यांनी आवरावं. शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधानं करणारे राऊत, त्यांना स्थानावरुन मोकळं करावं, अशी इच्छा आहे’ असं संभाजी भिडे सांगलीत म्हणाले.

‘शिवसेना ही सबंध देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, हिंदूराष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर शिवसेना ही अत्यंत अत्यंत अत्यंत, हो… अन्न, पाणी, वायू, सूर्यप्रकाश हे जीवन जगण्यासाठी लागतो. तशी शिवसेना आहे. तर माझी कळकळीची प्रार्थना आहे, उद्धवरावांना, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’ असं आवाहनही संभाजी भिडेंनी केलं आहे.

सांगली बंद

संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार, 17 जानेवारी) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. सांगलीमध्ये सकाळपासून दुकानं बंद आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उदयनराजे काय म्हणाले होते?

भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असा खोचक सल्लाही उदयनराजे यांनी शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांचा प्रतिहल्ला

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वांचा अधिकार आहे, ती कुणा एकाची मक्तेदारी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, अशी थेट मागणीच संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला.

Sambhaji Bhide appeals Uddhav Thackeray