शरद पवार म्हणाले, प्रबोधनकारांचं लिखाण वाचा, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तकं पाठवणार

| Updated on: Aug 17, 2021 | 2:52 PM

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसा जपावा, असा सल्लाही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेड पोस्टानं प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं राज ठाकरेंना पाठवणार आहे.

शरद पवार म्हणाले, प्रबोधनकारांचं लिखाण वाचा, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तकं पाठवणार
राज ठाकरे_शरद पवार
Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) कार्यकर्ते हे प्रबोधनकार ठाकरेंची (Prabodhankar Thackeray) पुस्तकं- साहित्य पाठवणार आहे. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसा जपावा, असा सल्लाही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेड पोस्टानं प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं राज ठाकरेंना पाठवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याशिवाय राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखणात दंतकथा नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद उफाळला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या आरोपानंतर खुद्द शरद पवारांनीही उत्तर दिलं होतं.

शरद पवार काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.

संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा

शरद पवारांनीही राज ठाकरेंना प्रबोधनकारांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिल्यानंतर, संभाजी ब्रिगेडने थेट कृती करण्यास सुरुवात केली आहे. आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

संभाजी ब्रिगेटचा पलटवार

राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

मनसेच्या वसंत मोरेंचा इशारा

प्रवीण गायकवाड यांनी केलेली टीका मनसेला चांगली झोंबल्याचं पाहायला मिळालं. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला.

श्रीमंत कोकाटेंचं उत्तर

मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार उत्तर श्रीमंत गायकवाड यांनी मनसेला दिलं.

संबंधित बातम्या 

पुणे कोण्याच्या बापाचे नाही, मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी उडवून लावली, पुन्हा वाद पेटणार?

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता खुद्द शरद पवारांकडून उत्तर