Video: ‘दिलेला शब्द मोडला’ संभाजीराजे छत्रपतींचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! ‘ना फोन उचलला, ना शब्द पाळला’

| Updated on: May 27, 2022 | 1:05 PM

कोल्हापुरात परतत असताना वेगळ्यात बातम्या समोर आल्या. मी वर्षावर शिवबंधन बांधणार, शिवसेनेत जाणार, वगैरे चर्चा सुरु झाल्या होत्या.

Video: दिलेला शब्द मोडला संभाजीराजे छत्रपतींचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! ना फोन उचलला, ना शब्द पाळला
उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेला शब्द मोडला,असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी टीका केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) लढवणार नाही आणि त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, हे देखील स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असं म्हणण्याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक आव्हान देखील केलं. ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, कोणतंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हानं दिलंय.

2 प्रस्ताव आणि मध्येच काय गडबडलं…?

संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषेदमध्ये बोलताना म्हटलंय, की..

जे मला बोलयाचं, ते बोलायची मला मुळीच इच्छा नाही, ते माझ्या तत्वातही नाही आणि रक्तातही.
पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितोय, की कोणतंही शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, तिथं आपण दोघंही जाऊ आणि दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांना स्मर करण करु.. आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग…

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या दोन खासदारांना मुख्ममंत्र्यांनी माझ्याकडे पाठवलं होतं. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांना मला सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत यावं.
पण मी त्यांना स्पष्टत सांगितलं होतं की मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही. पुन्हा दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच फोन केला आणि मला चर्चेचं निमंत्रण दिलं. मी त्यांना भेटायला गेलो, मुख्यमंत्रीपदाचा मान ठेवला. तेव्हा दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, आम्हाला ते सोबत हवेत, असं मुख्यमंत्री मला म्हणाले.

मुख्यमंत्री मला शिवसेनेत यायला सांगितलं, पण मी म्हटलं की मी अपक्ष लढणार आहे, त्याच क्षणी मी मुख्यमंत्र्यांना नकार दिला!
मग मी त्यांना एक प्रस्ताव दिला. शिवसेनेची आणखी एक सीट आहे, असं ते म्हणाले. शिवसेनेच्या पुढाकारातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला घोषित करा असंही मी त्यांना म्हणालो. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला म्हणाले की, राजे ते शक्य नाही.. पण शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार करायला आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले!

दोन दिवस विचार झाला.. मग फोन आला.. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यास सांगितलंय. अपक्ष शिवसेना पुरस्कृत उमेदवार घोषित करण्याच्या दृष्टीनं बैठक घ्यायची असं फोनवरुन सांगण्यात आलेलं.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि मी सुचवलेल्या सूचनांचा एक ड्राफ्ट तयार झाला, हा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे.. ओबेरॉयमध्ये बैठक झाली, शिष्टमंडळ आलं, एक मंत्री एक खासदार आणि एक स्नेही सोबत होते. मीटिंगआधीच त्यांच्या स्नेहींनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आजही असं वाटतंय, की तुम्ही शिवसेनेत यावं

तसं असेल तर ही मीटिंग इथंच संपली, असं मी म्हणालो. त्यानंतर माझी समजून काढून मला ड्राफ्ट वाचण्यास सांगितलं. ड्राफ्टमध्ये एक शब्द होता, तो फक्त दुरुस्त केला..मग मी कोल्हापुरात परतलो..

कोल्हापुरात परतत असताना वेगळ्यात बातम्या समोर आल्या. मी वर्षावर शिवबंधन बांधणार, शिवसेनेत जाणार, वगैरे चर्चा सुरु झाल्या होत्या. कोल्हापुरात गेल्यानंतर कळलं की संजय पवार यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलीय. म्हणून मग मी शिवसेना खासदारांना विचारणा केली मंत्र्यांना विचारणा केली, त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं! मुख्यमंत्र्यांनी काही माझा फोन घेतला नाही..

मला इतकं वाईट वाटतंय…, मुख्यमंत्र्यांकडून मला ही अपेक्षा नव्हती की दिलेला शब्द त्यांनी मोडला!

अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

पाहा व्हिडीओ :

‘दिलेला शब्द मोडला’

भाजप आणि शिवसेनेची युती मोडण्यामागेदेखील हेच तीन शब्द कारणीभूत होते. दिलेला शब्द मोडला, असा आरोप शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर करण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदावरुन युतीत झालेल्या वादाचा परिणाम ताणला गेला होता. अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडल्याचा आरोप करत शिवसेनेनं युती मोडली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं.

दरम्यान, आता संभाजीराजेंनीही शिवसेनेवर त्याच शब्दांत टीका केली आहे. मात्र आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना मला कुणाबद्दलही द्वेष नाही, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेचा राजकीय अजेंडा वेगळा आहे आणि माझा राजकीय अजेंडा वेगळा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.