संदीप देशपांडे-संतोष धुरींच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर

| Updated on: Sep 23, 2020 | 4:28 PM

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई लोकलमधील सविनय कायदेभंग आंदोलनानंतर आज (23 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली (Sandeep Deshpande meet Raj Thackeray).

संदीप देशपांडे-संतोष धुरींच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसैनिक कृष्णकुंजवर
Follow us on

मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मुंबई लोकलमधील सविनय कायदेभंग आंदोलनानंतर आज (23 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे (Sandeep Deshpande meet Raj Thackeray).

मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून दोन दिवसांपूर्वी (21 सप्टेंबर) लोकल प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत सहभागी झाले होते (Sandeep Deshpande meet Raj Thackeray).

या आंदोलनानंतर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम 147, 153, 156 अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडेसह काही मनसे नेत्यांना यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. गेल्या दोन दिवसात घडलेल्या या सर्व घडामोडींनंतर संदीप देशपांडे यांनी आज राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन भेट घेतली.

याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती.

“आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं, असे संदीप देशपांडे म्हणाले

“आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. त्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही. आमच्यावर तुमचा राग आहे तर मग रेल्वे प्रवासी संघटनांसोबत चर्चा करा. पण आंदोलन करु नये म्हणून ही सर्व हुकुमशाही सुरु आहे. लोकशाहीत चर्चा होऊन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली होती.

संबंधित बातम्या :

लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही, संदीप देशपांडेंची टीका 

पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव