बादशाहाच्या टोपीला मुजरा! ‘रोखठोक’मधून संजय राऊतांचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

| Updated on: Jan 10, 2021 | 7:50 AM

शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

बादशाहाच्या टोपीला मुजरा! रोखठोकमधून संजय राऊतांचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 46 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारमधील सलग 8वी बैठक निष्फळ ठरली आहे. नवे कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.(Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi)

स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठई 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय?, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केली आहे.

जॉन्सन यांच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन टीका

“सध्या आपल्या देशात नक्की काय सुरु आहे हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अवतरणार होते, पण इंग्रज जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला. वर्षभरापू्र्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्या भोवती असलेल्या अमेरिकेन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला आणि निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत.”

टाटा मोठे का?

दिल्लीची रया पूर्ण जाताना दिसत आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे आंदोलन सुरु असतानाही दिल्लीच्या सत्तावर्तुळात साधी सळसळही जाणवत नाही. पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्यात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्यांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या ‘शाही’त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते. आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या छोट्या घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले अव अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नितीचे समर्थक आहेत.

ही एकप्रकारे आणीबाणीच- राऊत

आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे का? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षात एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरु आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.

संबंधित बातम्या:

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला

‘भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय?’, सामना अग्रलेखातून टीकेचे आसूड

Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi