“हिंदू मुस्लिम नाही तर भारतीयांचा वरचष्मा, भागवतांचे विचार झटकण्यासारखे नाही, पण दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का?”

| Updated on: Jul 06, 2021 | 7:30 AM

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू मुस्लिमांच्या अनुषंगाने मांडलेले विचार दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहेत का? असा सवाल आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. (Sanjay Raut Saamana Editorial Slam BJP Over RSS Mohan Bhagwat Hindu Muslim Speech)

हिंदू मुस्लिम नाही तर भारतीयांचा वरचष्मा, भागवतांचे विचार झटकण्यासारखे नाही, पण दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का?
संजय राऊत, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : भारतासारख्या लोकशाही देशात हिंदू किंवा मुसलमान कुणाचाही वरचष्मा असू शकत नाही. वरचष्मा असेलच तर तो भारतीयांचा असेल, असं सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आपल्या भाषणात म्हणाले; पण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हे पटेल काय?, असा सवाल करत आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) सरसंघचालकांच्या भाषणावरुन भाजपला टोले, चिमटे आणि टोमणे लगावण्यात आले आहेत. (Sanjay Raut Saamana Editorial Slam BJP Over RSS Mohan Bhagwat Hindu Muslim Speech)

लोकांना आता धर्मद्वेषी राजकारण नको, सरसंघचालकांचे विचार पण भाजपला मान्य आहेत का?

लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे, असं सांगताना पश्चिम बंगाल, केरळात लोकांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं नाही आणि आता उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपविरोधी वातावरण तयार होतं आहे, असं अग्रलेखात म्हटलंय. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय?, असा रोकडा सवाल देखील अग्रलेखातून विचारण्यात आलाय.

भागवतांचे विचार झटकण्यासारखे नाहीत

गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱ्यांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत, असं अग्रलेखात म्हटलंय.

गोमांसावरुन झुंडशाहीचे बळी, हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग, सरसंघचालकांचा विसंगतीवर हल्ला

एखादी व्यक्ती काय खाते व पिते यावरूनही त्याला वेगळे ठरवता येणार नाही. गायीला देवता मानणे हा आपला धार्मिक आचार आहेच. त्या गोमांस भक्षणावरून राजकीय वातावरण तापवले गेले. घरात ‘बीफ’ आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. पण जेथे हिंदुत्ववाद्यांची सरकारे आहेत अशा अनेक राज्यांत गायींचे मांस विकले जात आहे व सरकारच्या तिजोरीत त्यातून मोठी कमाई होत आहे. एका बाजूला गोमांस विक्रीवरून, प्रार्थना पद्धतीवरून झुंडबळी आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग आहे. सरसंघचालकांनी याच विसंगतीवर हल्ला केला असल्याचं अग्रलेखात म्हटलंय.

आमचा मक्का मदिना याच मातीत असायला हवा

आमचा मक्का-मदिना याच मातीत असायला हवा. मक्केत बांग दिली तर येथील धर्मांध मुसलमान जागा होतो. फ्रान्स किंवा इतर देशांत कुठे इस्लाम खतऱयात आला की, येथील धर्मांध मुसलमान ‘इस्लाम खतरे में’चे नारे देत रस्त्यावर उतरतात. यामुळे राष्ट्र आणि राष्ट्रीय ऐक्य खतऱ्यात येते. आतापर्यंत काय घडले? या देशातील सरकारचे धोरण व सत्ताधाऱ्यांची मतांसाठी होणारी लाचारी यामुळेच देशात हिंदू-मुसलमानांचे झगडे किंवा दंगली होत राहिल्या.

असंख्य मुसलमानांकडे प्रेरणादायी म्हणून पाहावेच लागेल

अर्थात पाकिस्तानवर प्रेम करून कोण राहू पाहत असेल तर त्यांना विरोध होणारच. बांगलादेशी व रोहिंगे मुसलमान आपले कोणी लागत नाहीत. सरसकट सगळे मुसलमान देशद्रोही असे शिवसेनेने कधीच म्हटले नाही. देशप्रेम व राष्ट्रवादाचा आदर्श म्हणून पूर्वी व आताही असंख्य मुसलमानांकडे प्रेरणादायी म्हणून पाहावेच लागेल.

समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण मुस्लिमांनी हिंदुस्थानी म्हणून स्वीकारावं

अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मार्गी लावला व देशातील मुसलमान त्याप्रश्नी संयमानेच वागले. तिहेरी तलाकपद्धती रद्द करण्यावर मुस्लिम समाजातील महिलांनी स्वागत केले. समान नागरी कायदा असेल किंवा लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण, मुसलमान समाजाने ‘हिंदुस्थानी’ म्हणून या धोरणांचा स्वीकार केला पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

(Sanjay Raut Saamana Editorial Slam BJP Over RSS Mohan Bhagwat Hindu Muslim Speech)

हे ही वाचा :

मॉब लिंचिंग करणारे हिंदूविरोधी, सरसंघचालकांचं वक्तव्य, राऊत म्हणतात, ‘वक्तव्यामागे काही विशेष संदेश आहे का?’