खैरेंना ज्यानं पाडलं, तो मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेला, शिरसाटांची विखारी टीका, रोख कुठे?

खैरेंच्या लोकसभेतील पराभवासाठी त्यांच्याच गटातील नेते (अंबादास दानवे) जबाबदार असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय.

खैरेंना ज्यानं पाडलं, तो मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेला, शिरसाटांची विखारी टीका, रोख कुठे?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 30, 2022 | 3:43 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) पार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत शिंदे गटातील नेत्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर जहरी टीका केली. चंद्रकांत खैरे यांना ज्यानं पाडलं, तो त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन पुढे कसा निघून गेला, असा सवाल शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. चंद्रकांत खैरे यांना शप्पथ आहे, त्यांनी या प्रश्नाचं खरं उत्तर द्यावं, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. शिरसाट यांचा इशारा अंबादास दानवेंकडे होता. त्यामुळे या वक्तव्यामुळे जुन्या घटना पुन्हा उफाळून येणार अशी चिन्ह आहेत.

अनेक वर्षे लोकसभेत खासदारकी भूषवल्यानंतर 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा विजय झाला. तेव्हापासून चंद्रकांत खैरे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय.

मात्र खैरेंच्या या पराभवासाठी त्यांच्याच गटातील नेते (अंबादास दानवे) जबाबदार असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय.
सध्या शिवसेनेत मोठी फूट पडल्याने अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र शिरसाटांच्या वक्तव्यामुळे जुन्या वादाला तोंड फुटतं की काय, अशी स्थिती आहे.

काँग्रेसवर टीका करताना शिरसाट म्हणाले, काँग्रेस हे सुस्त अजगर आहे. एकदा खाल्लं पडलं की पुन्हा उठतच नाही.

याच मेळाव्यात अब्दुल सत्तारांनीही जोरदार भाषणबाजी केली. आधीचे मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब असे होते. आताचे मुख्यमंत्री लोकनाथ आहेत.. असं ते म्हणाले…

सत्तार म्हणाले मला कुत्रं निशाणी दिली तरी….

आपण निवडून यायचो आणि चिन्हांच्या नावावर फायदा ते घ्यायचे, अशा लोकांना आता भिंगातून शोधावं लागणार, अशी टीका अब्दुल सत्तारांनी शिवसेनेवर केली.