राष्ट्रवादीतील फूट टाइमपास, लोकांना दाखवण्यासाठी; शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

| Updated on: Jul 08, 2023 | 1:12 PM

अजित पवार भाजपसोबत आले म्हणून आम्ही बरोबर काम करण्याचं काही कारणच नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतच राहू, असं शरद पवार यांचे जुने सहकारी आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीतील फूट टाइमपास, लोकांना दाखवण्यासाठी; शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करून सरकारमध्ये भागही घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील या बंडावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या बंडामागे शरद पवार यांचाच हात असेल, ही शरद पवार यांचीच खेळी असेल असं सांगितलं जात आहे. तर या फुटीमुळे शरद पवार एकटे पडल्याचंही सांगितलं जात आहे. या चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे जुने सहकारी आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी अत्यंत धक्कादायक विधान केलं आहे. विशेष म्हणजे तावरे हे भाजपमध्ये आहेत. तरीही त्यांनी धक्कादायक विधान करून एक प्रकारे भाजपला सावध राहण्याचाच इशारा दिला आहे.

पवार कुटुंबातील फूट ही फक्त दिखावा आहे. लोकांना दाखवण्यासाठी ही फूट आहे. टाइमपास फूट आहे. निवडणुकांपर्यंत ज्या गोष्टी घडणार आहेत, त्यासाठी पडलेली ही फूट आहे. निवडणुकीत हे सगळे एकत्र येतील. त्यामुळे भाजप नेतृत्वाने अजित पवार यांच्या सहभागाबद्दल केलेली चूक सुधारावी, असं चंद्रराव तावरे यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सर्वांचे स्वभाव माहीत

मी 40 वर्षे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत होतो. प्रत्येकाचे स्वभाव मला माहीत आहेत. त्यांनाही माझा स्वभाव माहीत आहे. मला असं वाटतं ही फूट नसावी. ज्या काही चौकशा लागल्यात त्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोडवणूक करायची आहे. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर या सगळ्या हालचाली झाल्या, असा दावाही चंद्रराव तावरे यांनी केला आहे.

सर्व एकत्र येणार

राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे आरोप जरी झाले, कुणाला काढलं, कुणाला ठेवलं तरी निवडणुकीवेळी जरी शरद पवारांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं तर ते येणार नाहीत का? प्रफुल्ल पटेल असू द्या, वळसे पाटील, भुजबळ हे सगळे एकत्र येतील, असं सांगतानाच आमदार जुळवाजुळव ही तर खरी कला आहे. सगळ्या महाराष्ट्राला त्यांची कला माहीत आहे. कुणी कुठंही गेलं तरी काही दिवसांनी सगळे एकाच ठिकाणी असणार आहेत, असा दावा त्यांनी केला.

निवडणुकीतील वातावरणावर

सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचा भाजपने विडा उचलला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीवेळी जे वातावरण असेल त्यावर सुप्रिया सुळेंचे भवितव्य अवलंबून असेल. भाजप नेतृत्वाने शांतपणे विचार केला तर ही झालेली चूक ते अजूनही दुरुस्त करु शकतात, असं सांगत भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊ नये असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी दिला आहे.