Sharad Pawar : ‘छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांचा जोरदार टोला

| Updated on: Jul 23, 2022 | 4:51 PM

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केलंय. पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार टोला लगावलाय.

Sharad Pawar : छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर हा त्यांचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांचा जोरदार टोला
चंद्रकांत पाटील, शरद पवार
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात होता. राजकीय विश्लेषकही फडणवीसांच्या बाजूनेच कौल देत होते. मात्र, अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची शांतता पाहायला मिळाली. मात्र, भाजप नेत्यांच्या मनातील खदखद आणि नाराजी आज उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केलंय. पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार टोला लगावलाय.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले की छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असं पवार म्हणाले. सर्व सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनीच सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसत आहे. ते सत्ताधारी आहेत ते काय करतात करु द्या, आम्ही विरोधी पक्षात आहोत, असं पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

भाजप कार्यकारिणी बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झाला. तो बदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असं असतानाही आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं. पण ते पचवून आपण पुढे गेलो’.

भाजपची सारवासारव

केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर प्रदेशाध्यक्षांची अशाप्रकारची प्रतिक्रिया भाजपमध्ये अपेक्षित नाही. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानं शिंदे गट नाराज होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ काढण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरुन देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून सावरासावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता आमदार आशिष शेलार म्हणाले की पाटील यांनी तेव्हा असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तसंच पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ बाहेर आलाच कसा? हा अंतर्गत विषय आहे, असं शेलार यांनी म्हटलंय.