स्पेशल रिपोर्ट : शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये खरंच विलीन होणार?
ऐन लोकसभेच्या धामधुमीत पवारांनी विलीनीकरणावरुन भाष्य केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसरणीत फरक नाही. मात्र सहकाऱ्यांना विचारुनच अंतिम निर्णय घेणार, असं शरद पवार म्हणाले आहेत.
बारामतीचं मतदान संपताच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी मोठं विधान केलंय. पवारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीतच धमाका केलाय. प्रश्न होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? त्यावर शरद पवार म्हणाले, “पुढील 2 वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा स्वत:च्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीन होणं हे चांगलं आहे, असं त्यांना वाटलं तर ते त्या पर्यायाकडे पाहतील. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु विचारसरणीचे आहोत. मी आता काही सांगू शकत नाही. माझ्या सहकाऱ्यांशी बोलण्याशिवाय मी सांगणार नाही. काही निर्णय घ्यायचा असेल तर एकत्रितरित्या घेतला जाईल. भाजपसोबत जुळवून घेणं किंवा मोदींना सहन करणं कठीण आहे.”
शरद पवार स्वत:च्याच पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात सूचक बोलले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दुजोराही दिला. पवारांच्या बोलण्यात तथ्य आहे. देशपातळीवरच चर्चा सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलीय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “पक्ष चालवणं शक्य नाही हे कळालं असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं आहे. “मला माहिती नाही, शरद पवारच सांगू शकतील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी टीका करताना, शरद पवारांच्या याआधीच्या विलीनीकरणावर बोट ठेवलं. त्यामुळे पवारांचा काँग्रेससोबतचा इतिहासही समजून घेवूया.
शरद पवारांचा काँग्रेससोबतचा इतिहास नेमका काय?
- 1978 मध्ये पहिल्यांदा शरद पवारांनी बंड केलं आणि वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि स्वत: वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले.
- 1978मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार स्थापन झालं, त्यालाच पुलोदचं सरकार म्हणतात.
- 2 वर्षातच केंद्रात इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि त्यांनी 17 फेब्रुवारी 1980ला महाराष्ट्रातलं पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं.
- 1980च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आणि एआर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर जवळपास 6 वर्ष पवारांची समाजवादी काँग्रेस विरोधात बसली होती. आणि 1987 मध्ये पुन्हा शरद पवार राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आले आणि समाजवादी काँग्रेसचं, इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केलं.
- 1999 पर्यंत शरद पवार काँग्रेसमध्येच होते. पुन्हा पवारांनी सोनिया गांधींसोबत मतभेदामुळं 1999 मध्ये पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. मात्र 1999 मध्येच सोनिया गांधींच्या काँग्रेसोबत आघाडी केली. 1999 मध्ये केंद्रात वाजपेयीचं सरकार आलं तर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली.
शरद पवारांचा निर्णय 4 जूनच्या निकालावर अवलंबून असेल?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शरद पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. “याआधीही शरद पवारांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केलाय”, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत फूट पडली. मूळ राष्ट्रवादीची कमान पुतणे अजित पवारांकडे गेलीय. काका-पुतणे एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे ठाकले आहेत. पण विलीनकरणाचा शरद पवारांचा निर्णय 4 जूनच्या निकालावर अवलंबून असेल, असं काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय.
शरद पवार स्वत:च्या पक्षाच्या विलीनीकरणावर बोलले असं नाही. तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही भाष्य केलंय. उद्धव ठाकरे समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, ती आमच्यासारखीच आहे. याचा अर्थ हाच, की समजा शरद पवारांनी त्यांचा पक्ष विलीन केला. तरी ठाकरे आघाडीत त्यांच्या सोबतच राहतील. पवारांच्या या वक्तव्याला मोदींनी TV9ला दिलेल्या मुलाखतीची किनार आहे. अडचणीत ठाकरेंना मदत करणारा पहिला मीच असेल असं मोदी म्हणाले आहेत.
म्हणजेच उद्धव ठाकरे आमच्याच सोबत राहतील हेच सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे गटाची काँग्रेस झालेलीच आहे, फक्त औपचारिकता बाकी, असा हल्लाबोल शिंदेंनी केलाय. मुलाखतीनंतर पवारांना पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला. पण सांगितलंय खरं, एवढीच प्रतिक्रिया पवारांनी दिली. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंधर आहेत. राजकारण कोळून प्यायलेला नेता म्हणजे शरद पवार हे आताचे सत्ताधारीही मान्य करतात. अर्थात अजित पवारांच्या बंडाविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेलेलेच आहेत. पण त्याचवेळी त्यांचं विलीनीकरणाचं वक्तव्य विचारपूर्वकच असेल.