माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? शरद पवार

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा, असा सवाल करत शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. […]

माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? शरद पवार
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा, असा सवाल करत शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का? असा सवालही शरद पवार यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर लढण्यासाठी सुजय विखे इच्छुक होते. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. अर्थात विखे आणि पवार यांच्यातला संघर्ष जुना आहे. ही जागा न सोडण्यामागेही त्याच संघर्षाची किनार आहे. पवारांनी जागा न सोडण्याची घोषणा करतानाच जुन्या वादाचीही आठवण करुन दिली होती.

दरम्यान, शरद पवारांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. पराभवाच्या भीतीने त्यांनी माघार घेतल्याचा आरोप भाजपकडून होतोय. यालाही पवारांनी उत्तर दिलं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनाही कधी ना कधी पराभव पाहावा लागलाय. पण मी आतापर्यंत कधीही पराभूत झालो नाही. त्यामुळे भाजपचं वक्तव्य बालिशपणाचं आहे. गोंदियात पोटनिवडणूक झाली, तिथे राष्ट्रवादीचा विजय झाला. भाजपने अगोदर स्वतःकडे पाहावं, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवारांनी पक्ष हायजॅक केल्याच्या आरोपावर पवार काय म्हणाले?

शरद पवारांनी कौटुंबीक कारण दाखवत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याऐवजी त्यांनी नातू पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर केली. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी पक्ष हायजॅक केल्याचे आरोप केले जात आहेत. पण असे आरोप करणारे लोक वेडे आहेत, असं शरद पवारांनी म्हटलंय.

वंचित बहुजन आघाडीवर पवार काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. यामध्ये नांदेड, बारामती आणि माढाचाही समावेश आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी 48 जागा सोडून फक्त 24 जागा लढेल अशी परिस्थिती अजून आलेली नाही, असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत कोणतीही तडजोड करण्याची शक्यता फेटाळली आहे.

या निवडणुकीच्या नंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत. त्यांना जे बहुमतासाठी नंबर लागणार आहेत, ते मिळणार नाहीत. भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकेल, मात्र ते बहुमत मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे आघाडी करण्यासाठी मोदींना स्वीकारले जाणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us