महाविकास आघाडीची महाबैठक: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत एकमत : शरद पवार

| Updated on: Nov 22, 2019 | 8:36 PM

राज्याच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत सर्वात महत्त्वाची (Shiv Sena congress NCP Meeting for Maharashtra Government formation) बैठक झाली.

महाविकास आघाडीची महाबैठक:  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत एकमत : शरद पवार
Follow us on

मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत सर्वात महत्त्वाची (Shiv Sena congress NCP Meeting for Maharashtra Government formation) बैठक झाली. नेहरु सेंटरमधील या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल या सर्वांनी पहिल्यांदाच एकत्र बसून चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, हे ही या बैठकीत अधिकृत ठरवण्यात आलं. (Shiv Sena congress NCP Meeting for Maharashtra Government formation)

या बैठकीला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तब्बल दोन तासानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले. यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नावार एकमत झाल्याचं सांगितलं.

आमची चर्चा पूर्ण झालेली नाही. मात्र, सरकारचं नेतृत्व कोणी करावं यावर आमचं सर्वांचं एकमत झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं नेतृत्व करावं यावर आम्ही सर्वजण सहमत आहोत. सरकार कोणत्या किमान कार्यक्रमावर चालणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ती चर्चा सुरु आहे. लिखित स्वरुपता हे सर्व समोर येईल. उद्या पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाविषयीची माहिती, सत्तास्थापनेचं सूत्र अंतिम ठरेल, असं शरद पवार यांनी सांगितलं. 

मला तुम्हाला अर्धवट माहिती सांगायची नाही. जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तिघंही तुमच्यासमोर येऊन पूर्ण माहिती देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बैठकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि सुनिल तटकरे उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आज तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाली. मात्र, अद्याप चर्चा सुरुच आहे. उद्याही चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मात्र बैठकीतील चर्चेवर बोलण्यास नकार दिला. तसेच सर्व माहिती एकाच वेळी देणार असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, “तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची आणि सकारात्मक चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर सहमती झाली असून अनेक विषयांवर सहमती होणे बाकी आहे. उद्या (23 नोव्हेंबर) सर्व विषयांवर सहमती झाली की संपूर्ण माहिती देऊ.”

नवाब मलिक काय म्हणाले? 

तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  कोण मुख्यमंत्री होईल यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार.  किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली.
उद्या पत्रकार परिषद घेऊन सर्व मांडले जातील. राज्यपालांकडेही जाणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारची राहील. पत्रकार परिषद घेऊन सर्वांना माहिती देऊ. आम्ही सर्व मुद्दे मांडून सोडवले आहेत. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वांची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याची होती, असं नवाब मलिक म्हणाले.

महासेनाआघाडीच्या बैठकीला कोण कोण उपस्थित?

  • शिवसेनेकडून – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत, सुभाष देसाई
  • राष्ट्रवादी –  शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटील, नवाब मलिक
  • काँग्रेस – अहमद पटेल,पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणुगोपाल

 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिना पूर्ण होत आला. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग पकडलेला दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर आज मुंबईत तीनही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अभूतपूर्व ‘महासेनाआघाडी’ सरकार दृष्टीक्षेपात असून आजच्या दिवसात बैठका आणि चर्चांच्या अखेरीस अंतिम निर्णय हाती येणार हे निश्चित होतं.(Shivsena Congress NCP Meeting Updates)

आज काय काय झालं?

मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीतील घटकपक्षांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी घटक पक्षांची चर्चा झाली.

काँग्रेसची बैठक

घटक पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेसची स्वतंत्र बैठक झाली. काँग्रेसच्या बैठकीत आमदारांना राज्यातील राजकीय स्थितीची माहिती दिली, ही अनौपचारिक बैठक असल्यामुळे दिल्लीतील नेत्यांची हजेरी नव्हती, बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड झालेली नाही, त्याबाबत स्वतंत्र बैठक बोलावणार असल्याची माहिती, बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. राज्यातील आमदार मातोश्रीच्या दिशेने आले होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली.