Ambadas Danve | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 31 जुलैला औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन, अंबादास दानवे म्हणतात, काहीही करा, गद्दारीचा डाग निघणार नाही!

| Updated on: Jul 25, 2022 | 5:42 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. येत्या 30 जुलै रोजी ते नाशिकला भेट देतील. तर 31 जुलै रोजी ते औरंगाबादमध्ये येतील

Ambadas Danve | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 31 जुलैला औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन, अंबादास दानवे म्हणतात, काहीही करा, गद्दारीचा डाग निघणार नाही!
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, अंबादास दानवे
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं येत्या 31 जुलै रोजी औरंगाबादमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील सिल्लोड (Sillod) मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा हा मेळावा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या पाचही आमदारांद्वारे यावेळी औरंगाबाद विमानतळापासून सिल्लोड मतदार संघापर्यंत या दिवशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे. बंडखोर आमदारांच्या या शक्तिप्रदर्शनातून औरंगाबाद शिवसेनेतील बंडाची ताकद अधोरेखित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र आहे. मात्र ठाकरे गटातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मात्र बंडखोरांना आव्हान दिलं आहे. तुमचा दौरा कसा होतोय, बंडखोरांचं औरंगाबादेत स्वागत कसं होतंय, याचीच आम्ही वाट पाहतोय, असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील बंडखोर आमदारांबाबत मोठी नाराजी व्यक्त केली.

‘काहीही करा गद्दारीचा डाग निघणार नाही’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठ्या गाजावाजात औरंगाबादेत स्वागत होणार असल्याचं बोललं जातंय. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ बंडखोरांचं स्वागत होतंय. ते होण्याची आम्ही वाटच पाहतोय आम्ही. नैसर्गिक रित्या सगळ्या गोष्टी होणं आणि अनैसर्गिक गर्दी जमवणं यात फरक आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा नॅचरल होता. त्यांचं स्वागत झालं, त्याचं सभेत रुपांतर झालं. पण जे कुणी शक्तिप्रदर्शन करण्याचं प्रयत्न करतंय ते ओढून ताणून आहे. जनतेच्या मनातील भावना कोणी दाबू शकत नाहीत. या सगळ्या लोकांनी किती जरी शक्ती दाखवली तरी गद्दारीचा डाग निघणार नाही..

उद्धव ठाकरेंकडूनच बी फॉर्म मिळालाय नं?

आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांना आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीत विजयी होऊन दाखवा, असं आव्हान दिलंय. यावर सत्तारांनी उत्तर दिलं की, एकनाथ शिंदेंनी सांगितलं तर मी राजीनामा देईन, असं म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तारांना निवडणुकीत उतरण्यासाठीचा बी फॉर्म उद्धव ठाकरेंनी दिलाय. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सत्तारांनी राजीनामा द्यायला हवा. त्यामुळे अब्दुल सत्तारांचं जे काही चाललंय ते केवळ नाटक आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय.

मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. येत्या 30 जुलै रोजी ते नाशिकला भेट देतील. तर 31 जुलै रोजी ते औरंगाबादमध्ये येतील तर 01 ऑगस्ट रोजी ते पुण्यातील शिवसेनिकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्रात दौरे आयोजित केले आहेत. आठवड्यातील चार दिवस मंत्रालयात तर इतर तीन दिवस महाराष्ट्रा दौरे करण्याचे त्यांनी ठरवले आहे.