Hiraman Khoskar: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अजितदादांच्या पक्षातील आमदार सरसावला, थेट तटकरे, पटेलांना साकडे, आता राष्ट्रवादीची धुरा कुणाकडे?
Hiraman Khoskar on NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदारही आग्रही भूमिका मांडू लागले आहेत. एकीकडे वरिष्ठ नेते कानावर हात ठेवत असताना आमदार मात्र विलिनीकरणासाठी विनवणी करताना समोर येत आहे. सोमवार-मंगळवारी याविषयीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Hiraman Khoskar on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी शरद पवार गोटातूनच दावे करण्यात येत होते. पण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही हा आवाज बुलंद होताना दिसत आहेत. दादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवलेले असतानाच आमदार मात्र विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेताना दिसून येत आहे. अजितदादा यांच्या गटातील आमदार हिरामण खोसकर यांनी मोठा दावा केला आहे. विलिनीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले.
हिरामण खोसकर यांची विलिनीकरणासाठी आग्रही मागणी
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण शंभर टक्के झालं पाहिजे. जर दोन्ही पक्षांना जर वाटतं असेल की आपला नेता गेला. लीडर गेला. नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचं जे दोन-तीन महिन्यापासून सुरू होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. तसं झालं तर आम्हाला आनंद होईल. आम्हाला सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. पण त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा असे स्पष्ट मतं हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलं.
१२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होण्याची चर्चा
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत. बाळासाहेबे पाटील आहेत. राजेश टोपे हे आहेत. विलिनीकरण झाले तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल. ही चांगली गोष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार हे आम्ही ऐकले होते. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. पण विलिनीकरण होणार हे शंभर टक्के माहिती होतं, असं खोसकर म्हणाले.
सुनेत्रा पवार व्हाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष
आमच्या कानावर विलिनीकरणाची चर्चा येत होती. विलिनीकरण जर झाले तर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या असाव्यात. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत जे म्हणत आहेत, ते शंभर टक्के झालं पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल असे खोसकर म्हणाले.
30-35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने
सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यादिवशीच 30-35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने होते. तशी चर्चाही झाली होती. 40 पैकी 30-35 आमदारांमध्ये विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा हिरामण खोसकर यांनी केला. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्ट सांगितलं, असा दावा त्यांनी केला. मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. सुनेत्रा पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. त्यात मी विलिनीकरण व्हावे अशी स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे हिरामण खोसकर यांनी सांगितले. शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांशी आपली चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर इतका मोठा नेता गेला त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर म्हणाले.
