संजय राठोडांच्या राजीनाम्याला उशीर झाला? शिवसेनेचा मंत्रीही गेला आणि…

| Updated on: Feb 28, 2021 | 4:20 PM

पूजा चव्हाण प्रकरणात राज्य सरकार, शिवसेना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. समाज माध्यमातही हे प्रकरण चांगलच तापलं असताना अखेर राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

संजय राठोडांच्या राजीनाम्याला उशीर झाला? शिवसेनेचा मंत्रीही गेला आणि...
उद्धव ठाकरे-संजय राठोड
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या तासाभराच्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती. पूजा चव्हाण प्रकरणात राज्य सरकार, शिवसेना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. समाज माध्यमातही हे प्रकरण चांगलच तापलं असताना अखेर राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.(Shiv Sena’s image tarnished in Sanjay Rathod case)

अखेर राजीनामा द्यावा लागला

गेल्या 18 – 20 दिवसांत संजय राठोड यांच्यामुळे राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी सुरु होती. पोहरादेवी गडावर जात संजय राठोड यांनी शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळी हजारोंच्या संख्येनं बंजारा समाजाचे लोक आणि राठोड यांचे समर्थक जमले. त्यानंतर पोहरादेवी गडावरील एक महंत आणि त्यांच्यासह 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर राठोड यांना राजीनामा देणं भाग पडलं आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात नकारात्मक वातावरण

संजय राठोड यांच्या प्रकरणात सरकार आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात नकारात्मक वातावरण तयार झालं होतं. समाज माध्यमातूनही या प्रकरणात सरकारविरोधात वातावरण निर्मिती झाली होती. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला मोठा तडा जात होता. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची प्रतिमा जपण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपला हल्ल्याची संधी मिळाली

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्यांनी सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 20 दिवस या प्रकरणात कुठलीही भूमिका सरकारनं घेतली नाही. त्यामुळे भाजपला हल्ल्याची आयतीच संधी मिळाली.

राठोड ‘मातोश्री’वर भारी पडल्याचं वातावरण

संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर जवळपास 15 दिवस माध्यमांसमोर आले नाहीत. मात्र, बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी गडावर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी 10 हजाराहून अधिक राठोड समर्थक पोहरादेवी गडावर उपस्थित राहिले. राठोड यांचं हे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन मानलं गेलं. यावर शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. पोहरादेवी गडावर गर्दी जमवत राठोड हे एकप्रकारे ‘मातोश्री’वर भारी पडत असल्याचं चित्र निर्माण होत होतं. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला आहे.

संबंधित बातम्या :

ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

संजय राठोड यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

Shiv Sena’s image tarnished in Sanjay Rathod case