शिवसेना-भाजपला केवळ निम्म्या महाराष्ट्राचा कौल, 19 जिल्ह्यांमध्ये भोपळा

| Updated on: Oct 30, 2019 | 11:23 AM

कोल्हापूर, पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

शिवसेना-भाजपला केवळ निम्म्या महाराष्ट्राचा कौल, 19 जिल्ह्यांमध्ये भोपळा
Follow us on

मुंबई : सत्तास्थापना, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, उपमुख्यमंत्रिपद अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना-भाजपमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळत आहे. मात्र गेली पाच वर्ष सत्तेची चव चाखणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या बाजूने केवळ निम्म्या राज्यानेच कौल दिल्याचं निकालाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. कारण भाजपला चार, तर शिवसेनेला 15 जिल्ह्यांमध्ये एकाही विधानसभा मतदारसंघात खातं (Shivsena BJP Vidhansabha Seats) उघडता आलेलं नाही.

कोल्हापूर, पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. भाजपवर तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच हद्दपार होण्याची नामुष्की ओढवली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या भाजपच्या हातात असलेल्या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.

भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार होते. भाजपने तिन्ही विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र ही खेळी भाजपच्याच अंगलट आली आहे. कारण भाजपला तिन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. परिणय फुकेंनाही हायप्रोफाईल लढतीत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून पराभव स्वीकारावा लागला.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने तीन जागा टिकवल्या आहेत. मात्र माकप आणि राष्ट्रवादीने भाजपच्या दोन्ही जागा खेचून आणत पालघरातून भाजपचं संस्थान खालसा केलं आहे. रत्नागिरीत भाजपने एकही जागा लढवलेली नव्हती.

घसरण कुठे?

अमरावतीत भाजप चार जागांवरुन एकावर घसरली आहे, तर गोंदियात तीन जागांवरुन भाजपची एकावर घसरण झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या तीन जागांपैकी एक जागा भाजपच्या हातून निसटली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात भाजप चारवरुन निम्म्या जागांवर आली.

नांदेडमध्ये भाजपकडे एक जागा होती, ती वाढून दोनावर गेली आहे. मात्र विधानसभेच्या नऊ जागा असलेल्या नांदेडमध्ये भाजपचा खासदार असूनही दोन जागांवरच भाजपचा वारु अडला आहे. परभणीत भाजपने खातं उघडत एक जागा मिळवली, ती रासपमधून आलेल्या मेघना बोर्डीकरांच्या जोरावर. तर हिंगोलीतही भाजपला एकच जागा मिळाली आहे.

अहमदनगरमध्ये विखे पाटील पिता-पुत्रांनी बाराही जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदेंना पराभवाची धूळ चारलीच, सोबत भाजपला पाच जागांवरुन तीनावर आणून ठेवलं.

आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

बीड आणि सांगलीमध्येही भाजप चार जागांवरुन दोनावर आली आहे, तर लातूरमध्ये भाजपच्या वाट्याला दोनच जागा आल्या आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबादमध्ये भाजपने अनुक्रमे एक, एक आणि दोन जागा मिळवत खातं उघडलं तेही चार आयाराम आमदारांच्या बळावर.

शिवसेनेचीही दुर्दशा

राज्यात 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला विदर्भात मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भातील आठ राज्यांमध्ये एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. बुलडाण्यात दोन तर यवतमाळ-अकोल्यात सेनेचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला आहे. म्हणजेच विधानसभेच्या 62 जागा असलेल्या 11 राज्यांमध्ये सेनेचे केवळ 4 आमदार आहेत.

विदर्भातील आठ राज्यांशिवाय नंदुरबार, धुळे, जालना, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर या सात, म्हणजेच एकूण 15 जिल्ह्यांत शिवसेनेला आपलं खातं उघडता आलेलं नाही. नांदेड, हिंगोली, परभणी, पालघर, सांगलीमध्ये प्रत्येकी एक, तर नाशिक-साताऱ्यामध्ये प्रत्येकी दोनच जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

पुण्यात शिवसेनेला 21 पैकी केवळ सहा जागाच लढवायला मिळाल्या होत्या. परंतु शिवसेनेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही. दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही कशीबशी एक जागा टिकवून ठेवण्यात शिवसेनेला यश आलं आहे.

औरंगाबादमध्ये मात्र नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. मुंबई (13) आणि ठाणे (05) नंतर औरंगाबादेतच शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि रत्नागिरीत मिळून शिवसेनेचे (Shivsena BJP Vidhansabha Seats) निम्मे आमदार आहेत.