एक आड एक विधानसभेला निवडून येणारे खोतकर सलग विजय मिळवणार?

| Updated on: Oct 23, 2019 | 4:12 PM

दोन महिन्यांपासून राजकीय गराड्यात अडकलेले अर्जुन खोतकर हे निकालाची धास्ती न बाळगता आपल्या कुटुंबियांसोबत मनसोक्तपणे आनंद घेत आहेत.

एक आड एक विधानसभेला निवडून येणारे खोतकर सलग विजय मिळवणार?
Follow us on

जालना : मतदान झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला प्रतीक्षा असते ती निकालाची. पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री आणि जालना विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar Jalna Vidhansabha) हे निवडणुकीच्या कामातून विश्रांती घेत आपल्या कुटुंबात रमले आहेत. एक आड एक विधानसभेला निवडून येण्याचा इतिहास असलेल्या अर्जुन खोतकरांना यंदा सलग विजय मिळवण्याचा विश्वास आहे.

तब्बल दोन महिन्यांपासून राजकीय गराड्यात अडकलेले अर्जुन खोतकर हे निकालाची धास्ती न बाळगता आपल्या कुटुंबियांसोबत मनसोक्तपणे आनंद घेत आहेत. एकीकडे लेकाच्या लग्नाची तयारी सुरु असताना दुसऱ्या नातवासोबत खेळून ते विरंगुळा करत आहेत.

अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रीय. 1990 मध्ये अर्जुन खोतकर हे वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले. 1995 ते 1999 या काळात ते दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले. 1997 ते 1999 या काळात पाणीपुरवठा, पर्यटन, माहिती जनसंपर्क खात्याचं मंत्रिपद आणि उस्मानाबादचं पालकमंत्रिपद त्यांनी सांभाळलं.

दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर

1999 मध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे 2004 पर्यंत ते विधीमंडळाबाहेर राहिले. 2004 मध्ये खोतकर तिसऱ्यांदा आमदार झाले. मात्र घनसावंगी मतदारसंघात 2009 मध्ये त्यांचा पराजय झाला. 2014 मध्ये चौथ्यांदा आमदार होऊन ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. नांदेड आणि उस्मानाबादचं पालकमंत्रिपदही त्यांनी भूषवलं.

अर्जुन खोतकर यांचा (Arjun Khotkar Jalna Vidhansabha) विधानसभा निवडणुकीतील निकाल

1990 – विजय
1995 – विजय
1999 – पराभव
2004 – विजय
2009 – पराभव
2014 – विजय

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मराठवाड्यातील नामांकित कृषी उत्पन्न बाजार समितीवर सतत 15 वर्ष चेअरमन अशी विविध पदं त्यांनी भूषवली. जालना विधानसभा मतदारसंघात जालना शहरातील मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात.

साधारणपणे 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर युतीच्या काळात राज्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला होता. 2004 मध्ये पुन्हा मतदारांनी खोतकरांना संधी दिली, तर 2009 मध्ये पुन्हा गोरंट्याल यांना. 2014 मध्ये पुन्हा खोतकर केवळ 296 मतांनी विजयी झाले. मात्र यावेळेलाही परत मीच 25 हजारांनी निवडून येणार असल्याचा विश्वास खोतकरांनी व्यक्त केला आहे.

2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये बरीच तणातणी झाली होती. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. तसेच अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता. तसेच दानवेंना जालन्यात आस्मान दाखवू अशी टीकाही अर्जुन खोतकरांनी केली होती. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली आणि खोतकरांनीही सौहार्दाची भूमिका घेतली.

अर्जुन खोतकर यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात अख्खं कुटुंब उतरलं होतं. घर, प्रचार आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीला पार पाडावी लागली. यंदाची निवडणूकसुद्धा ते जिंकतील, असा विश्वास सीमा खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

खोतकर यांच्या घरी आता लगीनघाई असून उद्याचा निकाल, मुलाचे लग्न आणि दिवाळी असा ट्रिपल धमाका होणार असल्याचा विश्वास खोतकर कुटुंब व्यक्त करतात.