मधुमेहासारख्या 200 चाचण्या 1 रुपयात, शिवसेनेच्या वचननाम्यातील मोठ्या घोषणा

| Updated on: Oct 12, 2019 | 11:40 AM

शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व 'वचननामा' (Promises of Shivsena in Election) आज (12 ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.

मधुमेहासारख्या 200 चाचण्या 1 रुपयात, शिवसेनेच्या वचननाम्यातील मोठ्या घोषणा
Follow us on

मुंबई: शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ (Shivsena Manifesto in Assembly Election) आज (12 ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते हजर होते. या वचननाम्यात (Shivsena Manifesto in Assembly Election) मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडला आहे. यात मधुमेहासारख्या 200 चाचण्या 1 रुपयात करण्याचं मोठं आश्वासन देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी यातील सर्व आश्वसनं पूर्ण केली जातील, असा दावा केला आहे. मात्र, याआधीच्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचा इतिहास काही वेगळंच सांगतो. त्यामुळे शिवसेनेच्या वचननाम्यातील वचनं प्रत्यक्षात किती पूर्ण होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेच्या ‘वचननामा’मधील आश्वासनं

1. फक्तं 10 रुपयांमध्ये जेवणाची सकस थाळी.

2. गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा

3. वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.

4. महिला सक्षमीकरणावर भर.

5. कृषी उत्पनं आणि शेतकर्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना.

6.  उद्योग व्यापारावरासाठी विशेष योजना.

7. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना.

8. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना.

9. शहरांच्या विकासासाठी विशेष योजना.

10. रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त आश्वासने देत नाही, तर वचन देते आणि ते पूर्ण करते, असं म्हणत आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. काही वचने दसरा मेळाव्यात सांगितली आहेत आणि उरलेली वचने या वचननाम्यात देत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी निवडणुकीत चुरस नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून महाराष्ट्र हा वचननामा स्वीकारुन आम्हाल बहुमत देईल, असा विश्वासही व्यक्त केला.

शिवसेनेच्या वचननाम्यात प्रत्येक घटकासाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळच्या घोषणापत्रात आदित्य ठाकरे यांचाही सक्रिय सहभाग असल्याचं दिसून आलं. स्वतः आदित्य ठाकरे यांनी हा वचननामा अभ्यास करुन तयार केल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही लोकांची मागणी लक्षात घेऊन वचननामा तयार केला आहे. त्यात कोणत्या योजनेसाठी किती आर्थिक तरतुद लागेल आणि त्याची व्यवस्था कशी होईल, याचाही विचार करण्यात आला आहे.”

प्रथम ‘ती’

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार.

विद्यार्थी एक्स्प्रेस

तालुकास्तरावर गाव ते शाळा/महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी 2,500 विशेष बसची सेवा सुरू करणार.

वीज दरकपात

300 युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी करणार.

अद्ययावत आरोग्यसेवा

सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार.

अन्न हे पूर्णब्रह्म

राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार.

युवा सरकार फेलो

राज्यातील 15 लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार.

शेतकऱ्यांचे हित

शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिवर्षी जमा करणार.

मजबूत ग्रामीण रस्ते

राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टीकाऊ करण्याचे धोरण आखणार.

सन्मान निराधारांचा

निराधार पेन्शन योजने अंतर्गत मानधन दुप्पट करणार.

गावातील धार्मिक स्थळांना अनुदान

राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचं सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन अनुदान देणार.

शिवसेनेच्या वचननाम्यात ‘आरे’ला बगल.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यात ‘आरे’ला बगल दिली आहे. आरे हा मुद्दा मुंबईच्या वचननाम्यात असेल. मुंबईशी निगडीत स्थानिक मुद्द्यांचा त्यात समावेश असेल. आरेवर सर्वच राजकीय पक्षांनी आधी आपाआपली भूमिका जाहीर करावी, असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

विशेष म्हणजे आरेचा मुद्दा मागील काही काळात चांगलाच तापला आहे. तो केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे राज्याचं व्हिजन सादर करताना त्यात मुंबई आणि राज्याचे मुद्दे वेगळे करण्यामागील शिवसेनेच्या हेतूवर शंका व्यक्त केली जात आहे. आरे हा अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी त्यावर भाष्य करणं टाळलं होतं. त्यामुळे शिवसेना या मुद्द्यावर दबावाखाली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.