कपडे फाडून घेण्याची वेळ कोणावर येते बघूच, पुतण्याला जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर

| Updated on: Aug 26, 2019 | 3:28 PM

'मी चारित्र्य जपणारा माणूस आहे, त्यामुळे कोणावरही व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणं मला आवडत नाही. जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे' अशा शब्दात जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

कपडे फाडून घेण्याची वेळ कोणावर येते बघूच, पुतण्याला जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर
Follow us on

बीड : बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यातील वाक्-युद्ध आता सुरु झालं आहे. ‘मी चारित्र्य जपणारा माणूस आहे, त्यामुळे कोणावरही व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणं मला आवडत नाही. जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे’ अशा शब्दात शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्याने केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पराभवाच्या मानसिकतेमधून चारित्र्यहनन करत आहे. मात्र त्यांचं चरित्र कोण तपासणार? दुसर्‍यावर आरोप करताना आपण किती चारित्र्यवान आहोत हेदेखील पाहिलं पाहिजे. जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे. आगामी निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, हे दिसून येईल असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

रावणा, पंचाहत्तराव्या वर्षी धनुष्य उचलाल, तर बरगड्या तुटतील, संदीप क्षीरसागरांचा काकांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. ‘वय 75 वर्ष झाले. या वयात काही उद्योग करु नका. अरे रावणा, पंचाहत्तराव्या वयात धनुष्य उचलाल तर बरगड्या तुटतील’ असं संदीप क्षीरसागर म्हणाले होते. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत काहीच महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

आपले काका रावण आहेत अशी टीका करताना त्यांच्या देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचा आरोप पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला होता. देशात आणि परदेशातही जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर या दोघांच्या नावे संपत्ती आहे. 50 कोटी रुपये देऊन जयदत्त क्षीरसागरांनी मंत्रिपद विकत घेतलं, असा आरोपही त्यांनी केला होता.

निवडणुका तोंडावर आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सामाजिक व्यासपीठावर काका जयदत्त क्षीरसागर राजकीय भाष्य करत आहेत, असा आरोप करताना, यापुढे असं कराल तर याद राखा. कार्यकर्त्यांसह अण्णा तुमचेही कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही, असा थेट इशारा पुतणे संदीप क्षीरसागर यांनी दिला होता.

राजकारणात काका-पुतण्यातील वादाचा अंक अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. बीडसाठी तर तो नवीन नाहीच. विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडण्याआधीच चिखलफेक सुरु झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका ऐन बहरात आल्यावर हा वाद कोणतं टोक गाठणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.