राष्ट्रवादीसोबतही मुख्यमंत्रीपदावरुन सेनेचा ‘शब्द’ देण्याचा वाद? राऊतांचं नाशकातही रोखठोक ‘5 वर्ष’

| Updated on: Jun 13, 2021 | 5:13 PM

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण ,असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं रोखठोकपणे संजय राऊत सांगत आहेत. (Sanjay Raut )

राष्ट्रवादीसोबतही मुख्यमंत्रीपदावरुन सेनेचा शब्द देण्याचा वाद? राऊतांचं नाशकातही रोखठोक 5 वर्ष
शरद पवार, संजय राऊत , उद्धव ठाकरे
Follow us on

नाशिक: आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन संभ्रम निर्माण झाला आहे का? अशी चर्चा आता पुन्हा जोर धरु लागली आहे. त्याला कारण आहे. संजय राऊतांचं सामनातलं रोखठोक सदर आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा नाशकात दिलेलं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण ,असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं रोखठोकपणे संजय राऊत सांगत आहेत. ( Sanjay Raut said Shivsena hold five years CM Post no sharing with NCP and Congress creates political turmoil in Maharashtra)

नाशिकमध्ये संजय राऊत नेमके काय म्हणाले?

संजय राऊत हे सध्या खानदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून ते नाशकातही पक्षाच्या बैठका घेत आहेत. अशाच एका बैठकीनंतर दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस संबंधित पत्रकाराला करेक्ट करत राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून झालेली आहे. आणि मला असं वाटतं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहिरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे’.

शिवसेनेला पुन्हा पुन्हा का सांगावं लागत आहे?

शिवसेनेचा पाच वर्ष मुख्यमंत्री राहील असा शब्द आहे असं संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहीलेलं आहे. त्याचाच पुनर्रूच्चार त्यांनी नाशकात केला. विशेष म्हणजे पत्रकारानं टू द पॉईंट प्रश्न विचारण्यात गल्लत केली पण राऊतांनी उत्तर देताना टू द पॉईंट दिलं. त्यामुळेच राऊत किती जागृत होते याचा अंदाज येतो. हा विषयही किती महत्वाचा आहे हेही त्यावरुन स्पष्ट दिसतं. पण दिवसभर चर्चेत असलेला सवाल हाच आहे की, राऊतांना पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असं सांगण्याची पुन्हा पुन्हा वेळ का येत आहे? भाजपासोबत जसा शब्द देण्याघेण्यावरुन शिवसेनेचा वाद झाला होता तसाच वाद तो आता राष्ट्रवादीसोबत तर होणार नाही ना अशी
चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

शरद पवार नेमके काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी शरद पवार जाहीरपणे काय म्हणालेत याचा हवाला दिला आहे. अर्थातच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल बोलत आहेत. त्यादिवशी शरद पवार म्हणाले की,- ‘एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला जनता पक्षाचं राज्य आलं देशामध्ये, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना, अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला, आणि तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. तो नुसताच पुढं आला नाही तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना विधानसभेला एकही उमेदवार उभा करणार नाही. तुम्ही कल्पना करा, विधानसभेची निवडणूक आहे आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही एकही उमेदवार उभा करणार नाही, त्या नेत्याची स्थिती काय होईल? पण त्याची चिंता बाळासाहेब ठाकरेंनी कधी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता इंदिरा गांधींना निवडणूक न लढवण्याचा तो त्यांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येत नाही. कुणी काहीही शंका घेतली, तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं त्या कालखंडामध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली, तशी भूमिका सोडण्याचं या ठिकाणी आडाखे कुणी मांडत असतील तर ते वेगळ्या नंदणवनात राहतात एवढच याठिकाणी सांगू इच्छितो. हे सरकार टिकेल. पाच वर्ष काम करेल. नुसतंच पाच वर्ष नाही तर उद्याच्या लोकसभेला, विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून, सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं काम हा पक्ष करेल याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही’.

पवारांच्या बोलण्यातही संभ्रम?

संजय राऊत नाशकात म्हणाले की, शरद पवारांनीही पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री याबद्दल भाष्य केलेलं आहे. राऊतांचा रोख हा शरद पवारांच्या भाषणातल्या शेवटच्या चार ते पाच ओळींबद्दल आहे ज्यात ते म्हणतात की हे सरकार पाच वर्ष काम करेल. पवार कुठेही असं म्हणालेले दिसत नाहीत की पाच वर्ष मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल ज्याचा दावा राऊत करत आहेत. उलट शिवसेना शब्दाला कशी पक्की आहे हे आवर्जून पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळेच शिवसेनेचा शब्द देण्याघेण्यावरून भाजपसोबत जो वाद झाला होता तो इथं राष्ट्रवादीसोबतही होतोय की काय? अशी चर्चा आहे. शरद पवार जोपर्यंत पाच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच हे जोपर्यंत स्पष्टपणे सांगत नाहीत तोपर्यंत शिवसेनेची अडचण कायम आहे.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | आम्ही हात जोडून विनंती केलीय, आता निर्णय पंतप्रधान मोदी घेतील : संजय राऊत

सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा: संजय राऊत

(Sanjay Raut said Shivsena hold five years CM Post no sharing with NCP and Congress creates political turmoil in Maharashtra)