संजय राऊत यांच्या ‘रोखठोक’ प्रश्नांचा शरद पवार करणार ‘सामना’

संजय राऊत 29 डिसेंबरला पुण्यात शरद पवारांची जाहीर मुलाखत घेणार आहेत

संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांचा शरद पवार करणार सामना
Anish Bendre | Updated on: Dec 18, 2019 | 2:07 PM

नागपूर : शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. 29 डिसेंबरला पुण्यात पवारांची जाहीर मुलाखत घेणार (Sanjay Raut to Interview Sharad Pawar) असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ‘शरद पवार यांची मी नेहमीच भेट घेत असतो. काही भेटी राजकारणापलिकडच्याही असतात.’ असं राऊत म्हणाले.

राऊत आणि पवार यांच्या जवळीकीची नेहमीच चर्चा होते. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर राऊत कोणत्या विषयांवर पवारांना बोलतं करणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. सत्तास्थापनेमागील काही गुपितं आणि किस्से उलगडले जाण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गेल्या वर्षी शरद पवारांची पुण्यातच जाहीर मुलाखत घेतली होती. पवारांची ही ‘राज’कीय मुलाखत चांगलीच गाजली होती. आता पवार यांचा राऊत यांच्याशी सामना पाहायला मिळणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्या दोन नेत्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, ते पवार आणि राऊतच पाहुणे आणि मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळ्या मंचावर जाहीर मुलाखत घेतलेली आहे. त्यामुळे राऊत कोणते खुुसखुशीत प्रश्न विचारणार, ‘बोलंदाज’ संजय राऊत शरद पवारांना गुगली टाकणार, की वाक्चतुर शरद पवारच राऊतांना ‘क्लीन बोल्ड’ करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अध्यक्ष महोदय, ‘मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा अंगावर जायचो, पण……’

संजय राऊत आणि शरद पवार सध्या नागपूरमध्येच आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. ‘सभागृहात आम्हाला सक्षम विरोधी पक्ष पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाला पायरीवर बसायचे आहे, तर त्यांनी पायरीवर बसावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्री होते. त्यांना माहिती आहे वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांनी वेळ द्यायला हवा’ असं संजय राऊत म्हणाले होते.

भाजपने स्वप्न बघण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, आमचे सरकार पाच वर्षे टिकले पाहिजे. सावरकरांना कलंक म्हणणारे नेते आज भाजपमध्ये आहेत, असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut to Interview Sharad Pawar) यांनी केला आहे.

Follow Us