धनंजय मुंडेंबाबत साशंकता, पवार-उद्धव ठाकरेंकडून स्वतंत्र चर्चा

| Updated on: Nov 24, 2019 | 8:42 PM

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंबाबत साशंकता, पवार-उद्धव ठाकरेंकडून स्वतंत्र चर्चा
Follow us on

मुंबई : परळी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भूमिकेविषयी शिवसेनाच नाही, तर राष्ट्रवादीतूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी (Shivsena NCP Suspicious about Dhananjay Munde) दिली आहे.

अजित पवारांनी काल बंड पुकारत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे दिवसभर संपर्कात नव्हते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावली आणि आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जातं.

धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. धनंजय मुंडे यांनी काका आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला, तो अजित पवारांच्या पुढाकारानेच. त्यामुळे आता अजित पवारांच्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे वेगळी भूमिका घेणार का, असा संशय सेना-राष्ट्रवादीच्या गोटात आहे.

धनंजय मुंडेवर संशय व्यक्त केला जात असल्यामुळे त्यांनीही ट्विटरवर ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. “मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करु नये ही विनंती”, असं ट्वीट धनंजय मुंडेंनी करत आपली बाजू मांडली.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘हॉटेल रेनेसाँ’मध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. आपलंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास आमदारांना देण्याचा प्रयत्न यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला. उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यातही बंद दाराआड काहीवेळ गुप्त चर्चा झाली.

‘आपलंच सरकार स्थापन होईल. काळजी करु नका. विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला बैठकीत नेत्यांनी आमदारांना दिला.

राष्ट्रवादीच्या आमदारांना ‘हॉटेल रेनेसाँ’मधून सुरक्षेच्या कारणास्तव ‘हॉटेल हयात’मध्ये हलवण्यात आलं. काँग्रेस आमदार ‘जे. डब्ल्यू मॅरिएट’मध्ये वास्तव्याला आहेत, तर शिवसेना आमदारांचा मुक्कामही ‘ललित’मधून ‘लेमन ट्री’मध्ये बदलण्यात आला.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले

भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरवले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरवणारे आहे, असं शरद पवारांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे.

मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. या ट्वीटलाच शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार (Shivsena NCP Suspicious about Dhananjay Munde) पुढे म्हणाले.