Ramdas Kadam : कोण अरविंद सावंत, कोण विनायक राऊत, त्यांची औकात तरी आहे का? रामदास कदम संतापले

| Updated on: Jul 19, 2022 | 1:35 PM

Ramdas Kadam on Shivsena : हे काय मला पक्ष शिकवत आहेत? शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारा आहे मी, असंही ते म्हणाले.

Ramdas Kadam : कोण अरविंद सावंत, कोण विनायक राऊत, त्यांची औकात तरी आहे का? रामदास कदम संतापले
रामदास कदम यांचं टीकास्त्र
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) ढवळून निघालेलं आहे. आता तर शिंदे आणि फडणवीस (Eknath Shinde Devendra Fadnavis Government) यांचं सरकारही स्थापन झालं आहे. पण राजकीय भूकंपाचे पडसाद अजूनही उमटत असून रामदास कदम (Ramdas Kadam News) यांनी पत्रकार परिषध घेऊन आता उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर हल्लाबोल केलाय. कोण अरविंद सावंत, कोण विनायक राऊत, त्यांची औकात तरी आहे का? अशा शब्दांत पत्रकार परिषदेतून संताप व्यक्त केलाय. रामदास कदम यांची शिवसेनेच्या नेतेपदावरी हकालपट्टी करण्यात आली. सोमवारी करण्यात आलेल्या हकालपट्टीच्या आधीच आपण राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील अंतर्गत बंडाळीवरही रामदास कदम यांनी तिखट शब्दांत टीका केली. आपल्या मनातील खदखद रामदास कदमांनी यावेळी बोलून दाखवली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही रामदास कदम हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मतदारसंघात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली होती. दरम्यान, आता तर खुलेआम रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. तसंच बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात ते उतरले असल्याचं पाहायला मिळतंय.

सावंत आणि राऊत यांच्यावर हल्लाबोल

अरविंद सावंत म्हणतात तुमची आणि राष्ट्रवादीची आतून मिलीभगत आहे, असा प्रश्न रामदास कमद यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रामदास कदम यांनी अरविंद सावंत यांच्यासह विनायक राऊत यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की…

‘माझ्या सारख्या माणसावर कोण आरोप करेल. यांची हिंमत काय आहे? कोण अरविंद सावंत आणि कोण तो विनायक राऊत हो… त्यांची औकात आहे का माझ्यावर बोलायची? मी योगदान दिलंय ५२ वर्ष. अंगावर अनेक केसेस घेतल्या. तुरुंगात गेलो. २००५मध्ये बाळासाहेबांनी मला बेळगावला पाठवलं होतं. गुन्हा दाखल झाला होता. त्याचा कालच दहा लाखाचा जामीन घेतला. हे काय मला पक्ष शिकवत आहेत? शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारा आहे मी. माझा मर्डर करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. बायका मुलं नव्हती का आम्हाला? आमदार जातात, फूट पडली. ही मिलीभगत आहे का. मीडियात दिसतो म्हणून तोंडाला वाटेल ते बोलायचं.

हे सुद्धा वाचा

भविष्यात माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य राहिली पाहिजे. पुन्हा भगवा फडकला पाहिजे, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे मी दौरे करणार, असंही रामदास कदमांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की मी नाईलाजाने मी राजीनामा दिला. मला समाधान नाही. माझ्या मुळावरच तुम्ही उठला, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. माझ्या मुलाला राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करायला निघाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.