अजित पवार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोले यांनी तीन ओळीत प्रश्न मिटवला

| Updated on: May 07, 2023 | 1:49 PM

Nana Patole on Ajit Pawar Maharashtra CM : 2024 ची विधानसभा निवडणूक, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् काँग्रेसची भूमिका; नाना पटोले यांची सविस्तर प्रतिक्रिया

अजित पवार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोले यांनी तीन ओळीत प्रश्न मिटवला
Follow us on

सोलापूर : अजित पवार आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आलं आहेत. अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असेल, अशीही चर्चा झाली. त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजित पवार असतील. तर काँग्रेसची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाना पटोले यांनी तीन ओळीत उत्तर दिलं.

निवडणुका आताच होत नाहीत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील का? हे कसं सांगू? आताच सांगणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने ठरतील, असं नाना पटोले म्हणालेत.

ठाकरे गटाची भूमिका

अजित पवार, राज्याचं मुख्यमंत्रिपद अन् महाविकास आघाडीची भूमिका यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय. अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील तर शिवसेनेची काय भूमिका असेल? या प्रश्नाचं त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. मुख्यमंत्री कोण होणार, याची सध्या महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेसची भूमिका

बारसूत ज्या ठिकाणी रिफायनरीचा प्रकल्प होतोय, त्या ठिकाणी मी स्वत: जाऊन आलो.सरकारकडून जास्त पैसे मिळवण्यासाठी जमिनीला मोबदला मिळावा म्हणून पर्यावरण आणि जनतेचा विचार सरकार करीत नाही. या प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

मी पुन्हा येईल, असं म्हटलं की मी येतोच, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर नाना पटोले यांनी भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस दिवसा स्वप्न बघतात. मी पुन्हा येईल ते म्हणाले होते. ते कुठे मुख्यमंत्री झाले. मी असतो तर उपमुख्यमंत्रिपदच घेतलं नसतं. आमचे मित्र आहेत. त्यांचं खुर्चीशिवाय काही चालत नाही, असं नाना पटोले म्हणालेत.

येणारा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असून या आठवड्यात अनेक राजकीय घटना घडतील. जनेतला लुटण्याचं काम आणि 105 सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपाने राज्यात तमाशा केलाय. महाराष्ट्राचे तुकडे करून महाराष्ट्राची तिजोरी गुजरातला नेण्याचे काम भाजपने केलंय, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.