शिवसेना आमदाराचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात ‘तो मी नव्हेच’! तर भाजपकडून मात्र पत्राला जनभावनेची उपमा

| Updated on: Jan 09, 2022 | 7:20 PM

या पत्रात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मात्र या पत्राबाबत वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र हे पत्र जनभावना असल्याचं म्हटलंय.

शिवसेना आमदाराचं ते पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात तो मी नव्हेच! तर भाजपकडून मात्र पत्राला जनभावनेची उपमा
संतोष बांगर, आमदार, शिवसेना
Follow us on

नांदेड : सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST Workers Strike) सुरु आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी हजारो एसटी कर्मचारी (ST Employee) अद्यापही संपावर ठाम आहेत. या संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी आता दुखवटा असं नाव दिलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणात कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या लेटरहेडवरील एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्रात एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मात्र या पत्राबाबत वेगळंच स्पष्टीकरण दिलंय. तर भाजप आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी मात्र हे पत्र जनभावना असल्याचं म्हटलंय.

संतोष बांगर यांच्या पत्रात नेमकं काय?

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून एसटी कर्मचारी आणि कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कामगार हे तुटपुंजा वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

आता वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटाला कंटाळून एसटी महामंडळाच्या 63 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तरी एसची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करुन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.

संतोष बांगर यांचं स्पष्टीकरण काय?

एसटीच्या विलीनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी वेगळाच खुलासा केला आहे. रुग्णासाठी सही करून ठेवलेल्या माझ्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय. तातडीची मदत व्हावी यासाठी एका रुग्णाने पत्र मागितले होते. त्यामुळे सही असलेले कोरे पत्र ऑफिसमधून देण्यात आले. मात्र त्यावर काहीतरी लिहून त्याचा कुणीतरी दुरुपयोग केला, असा खुलासा आमदार बांगर यांनी केलाय. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतील, तो आमचा अधिकार नाही असंही आमदार बांगर यांनी म्हटलंय.

अतुल भातखळकर म्हणतात, ते पत्र म्हणजे जनभावना

आमदार संतोष बांगर यांचं पत्र ही राज्यातील जनतेच्या मनातील भावना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर दबाव आणत हे पत्र मी लिहिलेच नाही असं सांगायला लावलं आहे. पण मुख्यमंत्री महोदय किती दिवस किती जणांचा आवाज दाबणार आहात? 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाहीत. पक्षातील किंवा पक्षाबाहेरील कुणी बोललं की त्यांचा आवाज दाबण्याची हुकुमशाही चालणार नाही, असा इशाराही भातखळकर यांनी दिलाय.

इतर बातम्या :

Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन

Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड