राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाचा विचार?

| Updated on: Nov 18, 2021 | 11:02 PM

एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेते म्हणत आहेत. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही तर एसटीच्या खासगीकरणाबाबत विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाचा विचार?
एसटी बस
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर विलिनीकरण शक्य नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेते म्हणत आहेत. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही तर एसटीच्या खासगीकरणाबाबत विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. (Gopichand Padalkar and Sadabhau Khot criticize Thackeray government)

एसटीचे खासगीकरण होऊ शकतं का? याबाबत महामंडळानं कमिटी नियुक्त करुन अभ्यास अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती मिळतेय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाने एसटीचे विलिनीकरण करण्यापेक्षा खासगीकरण होऊ शकतं का, याबाबत महामंडळाने एक कमिटी नियुक्त केलीय. एसटीच्या शिवनेरीच्या खासगी बस एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत. तशाच पद्धतीच्या हजार खासगी गाड्या घेऊन एसटी महामंडळाचा तोटा भरुन निघू शकतो का? याबाबत या कमिटीला आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशात हाच खासगीकरणाचे मॉडेल राबवण्यात आले आहे. त्याचाही अभ्यास या कमिटीला करण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळतेय.

काय आहे उत्तर प्रदेशाचा फॉर्म्यूला?

उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळात सध्या 11 हजार 393 बसेसचा ताफा असून, यातील दररोज 9 हजार 233 बसेस रस्त्यावर धावतात. यातील 2 हजार 910 बसेस या भाडेतत्त्वावर धावत आहेत. एकूण बसेसपैकी 30 टक्के बसेस उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात खासगी बसेस आहे. या बसेसच्या ताफ्यानुसार उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात फक्त 21 हजार 10 कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रति बसेसवर फक्त ३ कर्मचारी आहेत.

पडळकर, खोतांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. एसटीच्या खासगीकरणाबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. राज्य सरकार अफवा पसरवण्याचं काम करत आहे. असं असेल तर जनताच ते मान्य करणार नाही. राज्य सरकारनं भूमिका घेतल्यानंतर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन पुढे काय भूमिका घ्यायची ते ठरवू, असं पडळकर यांनी म्हटलंय.

तर सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्य सरकारकडून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. आताही तसंच आहे. कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही काही एक-दोन दिवसांतील प्रक्रिया नाही. हा संप कसा मोडून काढता येईल हा अभ्यास राज्य सरकार करत आहे. ही आपलीच माणसं आहेत. यांच्याशी शत्रूप्रमाणे वागू नये. चर्चा करुन तोडगा काढावा.

इतर बातम्या :

आटपाडी राडा प्रकरणात गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होणार?

VIDEO: एसटी संपावर फडणवीस-परब यांच्यात चर्चा, तोडग्यांचा फॉर्म्युला परब देणार, पगारवाढीचा मुद्दा कसा सुटणार?

Gopichand Padalkar and Sadabhau Khot criticize Thackeray government