माझा पराभव माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असता, आई-वडिलांचं राजकीय भविष्यही पणाला लागलेलं : सुजय विखे पाटील

| Updated on: Dec 16, 2020 | 4:05 PM

"पक्ष शेवटच्या क्षणाला बदलला तेव्हा माझे वडील विरोधी पक्षनेते होते. त्यांचंही राजकीय भविष्य मी पणाला लावलं", असं सुजय विखे पाटील म्हणाले (Sujay Vikhe Patil says his family reaction after he leave Congress).

माझा पराभव माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असता, आई-वडिलांचं राजकीय भविष्यही पणाला लागलेलं : सुजय विखे पाटील
Follow us on

मुंबई : भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी गेल्यावर्षी ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र, या निवडणुकीदरम्यान त्यांच्या मनावर नेमकं काय दडपण होतं, कुटुंबातील सदस्यांची काय घालमेल होती, याबाबत सुजय विखे पाटील यांनी भाष्य केलं. ‘झी मराठी’च्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी आपली बाजू मांडली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Minde), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सुजय विखे पाटील एकाच मंचावर बघायला मिळाले (Sujay Vikhe Patil says his family reaction after he leave Congress).

“पक्ष शेवटच्या क्षणाला बदलला तेव्हा माझे वडील विरोधी पक्षनेते होते. त्यांचंही राजकीय भविष्य मी पणाला लावलं. माझी आई जिल्हा परिषद सदस्य होती. त्याही वेगळ्या पक्षाच्या होत्या. आता मी निवडून आलो हा भाग वेगळा आहे. माझा पराभव जर झाला असता, तर कदाचित वेगळं चित्र असतं. राजकारणात लोकं परत संधी देत नाहीत. एकदा एखादं राजकीय कुटुंब संपायला लागलं तर ते संपतं. माझा पराभव हे माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असता”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

“शेवटी राजकारणात विरोधक संधी पाहतात, हे कसे संपतील. कारण आम्ही फार संघर्ष करुन इथपर्यंत आलो आहोत. आमचं, पंकजा ताई आणि रोहित दादा यांचं कुटुंब असे आहे की हे कसे संपतील याची विरोधक वाट बघत असतात. आमचे असे कुटुंब आहेत की लोकं संधी पाहतात एकदा फक्त तावडीत सापडला की त्याला दाबायचं. मला निवडणुकीची कधीच चिंता वाटली नाही. मला प्रचारातही कोणतीच भीती वाटली नाही. मात्र, मतमोजणीच्या दिवशी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तेव्हा मला वाटलं, मी फार मोठी गोष्ट पणाला लावली आहे. मला त्या क्षणाला जाणीव झाली. सुदैवाने चांगलं घडलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“मी डॉक्टर असताना राजकीय क्षेत्रात येण्यामागे तसं फारसं काही कारण नव्हतं. माझं शिक्षण संपल्यानंतर माझ्या वडिलांच्या कार्यालयाचं काम बघायला कुणी नव्हतं. मी माझ्या वडिलांचा पीए म्हणून सात वर्ष काम केलं. मी कोणतीही राजकीय निवडणूक लढली नव्हती. रोहित पवार जिल्हा परिषद अध्यक्ष झाले नंतर आमदार झाले, तसं मी खासदार होण्याआधी कोणतीही निवडणूक लढली नव्हती”, असं सुजय म्हणाले.

“मी वडिलांच्या कार्यालयाचे कामं पाहायचो, स्थानिक पातळीवर कामं करायचो. हे काम करत असताना जनतेने प्रेम दिलं. जनता स्वीकारायला लागली. त्यामुळे हळूहळू राजकारणाची आवड निर्माण झाली. शेवटी संधी समोरुन चालून आली. निवडणुकीला उभं राहताना आपण ठरवत नाही की हे झालंच पाहिजे. उभं राहिलो, लोकांनी प्रेम दिलं आणि खासदार झालो”, असं मत त्यांनी मांडलं (Sujay Vikhe Patil says his family reaction after he leave Congress).

संबंधित बातमी :

राजकीय पक्ष बाजूला ठेवून ऊसतोड कामगारांसाठी काम करुया, पंकजा ताई किंवा रोहित पवारांनी नेतृत्व करावं : सुजय विखे पाटील

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो मोठा निर्णय