Uddhav Thackeray | ‘येत्या 6 तारखेला बारसूला जाणार’, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

"मी येत्या 6 तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी बारसूला जाणार. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार", अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray | येत्या 6 तारखेला बारसूला जाणार, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
| Updated on: May 01, 2023 | 9:38 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमूठ सभेत मोठी घोषणा केली आहे. रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्प वादात सापडला आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे बारसूत जाणार असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले होते. पण भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता. उद्धव ठाकरे यांना रत्नागिरीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राणेंनी दिला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपण येत्या 6 मे ला बारसूला जाणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

“मी येत्या 6 तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी बारसूला जाणार. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्राचा देखील उल्लेख केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाणार प्रकल्प बारसूला हलवण्याचं पत्र पाठवल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. ठाकरेंनी त्यावर उत्तर दिलं. आपण बारसूला प्रकल्पाचं पत्र पाठवा असं पत्र पाठवलं. पण स्थानिकांच्या विरोधात हा प्रकल्प व्हावा, असं पत्रात म्हटलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

महाराष्ट्राने रक्त सांडून बलिदान देऊन आपली स्वतःची हक्काची ही राजधानी मिळवली आहे. ही लढून मिळवलेली राजधानी आहे. काल मध्यरात्री बारा वाजताच मी आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व शिवसैनिक जमले होते. अरविंद सावंत होते.

महाराष्ट्र दिवस एकवेळेस सुरू झाला की साधारणपणे मध्यरात्रीपासून आपण तिकडे सजावट करतो, घोषणाही करतो, पण काल आम्ही तेव्हा पोहोचलो तोपर्यंत सरकारकडून आणि महापालिकेकडून कोणी तिकडे फिरकलेला नव्हता. संपूर्णपणे फुलांची जी काही सजावट होती ती आपल्या शिवसैनिकांनी केली होती. तिकडे हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत असताना अभिवादन करताना मला एक सांगायचे की, त्यांनी लढा दिला नसता, संघर्ष केला नसता तर आज गद्दारी करून का होईना पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सर्वसामान्यांनी दिला होता. मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षक सत्तेत बसला होता. मुंबई, गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटला होता. पोलीस एवढे मातले होते की इमारतींवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. अनेकजण गुदरमरले. महिला रणरागिनी, तान्ही बाळं घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि हिंमत असेल तर गोळ्या घाला, पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं महिला म्हणाल्या होत्या.

Follow Us